Wednesday, 3 October 2018

मि. गांधी, इटस फॉर यू!



मि. गांधी, अभिनंदन. तुम्ही १५० वर्षांचे झालात. केक पाठवतोच तुम्हाला, पण म्हटलं चला जरा गप्पा पण मारून घेऊया. तसं तुमच्या बर्थडेलाच लिहिणार होतो . पण, तेव्हा भक्तीचा महापूर आला होता. सोचा, भक्तीरसाचे पाझरणे थोडे थांबू देऊया, मग तुम्हाला एक कॉल मारू! आता कसं आपल्याला दोघांनाही फुरसत आहे. ते काय आहे ना,  माझ्यातच थोडा प्रॉब्लेम आहे. असा एका कोणत्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात राहून राहून गहिवर दाटून येत नाही. मग ते तुम्ही असा, सावरकर असा नाही तर हेडगेवार असा. राम-कृष्णाबद्दलच आपलं असं भक्तीचं नातं नाही, त्यामुळे तुम्हा कुणाबद्दल असण्याचा काही प्रश्नच नाही. आता, यात तुम्हा कुणाचा अनादर करण्याचा काही हेतू नाही हो बावा.! नाही तर घ्याल मनाला लावून. पण, त्याचं काय आहे ना, ‘अखिल भारतीय देव बनवा संघटने’चे आपण चार आण्यांचे सुद्धा सदस्य नाहीत. मग तो देव कोणताही असो. पण, म्हणून तुम्हा कुणाबद्दल राग नाही, हे नक्की! म्हणजे काय होतं ना, की कुणी असं ‘बापू’ वगैरे म्हटले, की कानावर हात ठेवून किंकाळणारी निरुपा रॉय नाही तर ए.के. हंगल आपल्याला आठवतात. सो ते राष्ट्रपिता, बापू वगैरे काही मला जमलं नाही. जसं मला देव नामक एन्टिटीपुढे कर्मकांड करणं जमत नाही, तसंच!
पण, तुम्ही मला राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक नेते म्हणून निश्चितच भावता. तुम्ही सगळेच. त्यातही मि. गांधी, तुम्ही तुमच्या समकालीनांपेक्षा सरसच होता. राजकारणी हा चतुर, धूर्त, लोकांची नस ओळखणारा, लाट तयार करणारा, लाटेवर स्वार होणारा, योग्य वेळी भूमिका नव्वद अंशाच्या कोनातही बदलण्याची तयारी असणारा असावा लागतो. तुम्ही असे होतात. समाजशास्त्रांचा, माध्यमशास्त्राचा आणि पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे कितीतरी वेळा बघतो, विचार करतो. पॉलिटिकल कम्युनिकेशन नावाचा प्रकार तुम्ही काय प्रभावीपणे हाताळलात.! समाजातील बहुसंख्यांना काय अपिल होईल याचं तुमच्या इतकं अचूक ज्ञान तुमच्या समकालींनापैकी कुणालाच नव्हतं, असं आता वाटतं राहत. राजकारण करताना प्रतिके तयार करणं खूप महत्वाचं असतं. या प्रतिकांमधून सामान्यांपर्यंत संदेश पोहोचवायचा आणि त्यांना आपल्याशी जोडून घ्यायचं हे कसबी राजकारण्याचं कौशल्य असतं. मि. गांधी, तुम्ही यात खूपच वरचढ होतात. ते तुमचं पंचा नेसून असणं, आत्म्याचा आवाज, चरखा, मिठाचा सत्याग्रह, प्रभात फेरी, उपोषण आणि त्यागमूर्तीवाली प्रतिमा. सगळंच अप्रतिम!
भारतीय मनाला त्यागाचं, साधेपणांचं पूर्वापार अप्रूप आहे. तुमच्याही पूर्वीपासून. ऋषी, मुनी किंवा संतपरंपरेतून आलं असेल का ते. तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. तुम्ही ते अप्रूप बरोबर हेरलं. आयुष्यभर पंचा स्वीकारणे सोपे नाहीच पण ती झाली दिसणारी कृती. त्या कृतीतून तुम्ही राजकीय नेते म्हणून ज्या खुबीने लोकांशी स्वत:ला जोडून घेतलं, ते लाजवाब होतं. तीच बाब चरख्याची, खादीची, प्रभात फेरींची, उपोषणांची! चरखा चालवून आणि येथे खादी घालून काही मँचेस्टरच्या कापड गिरण्या बंद पडल्या नसत्या. इंग्रजांनी आणखी कोणत्या तरी देशात कापूस उगवून त्या चालविल्याच असत्या. म्हणजे भारतीय लोक त्यांचे कपडे घालीत नाही म्हणून काही इंग्रज उद्योगपती रस्त्यावर नसते आले. अशी आपली कितीशी पर्चेसिंग पॉवर असेल तेव्हा. आजच्या सारखी मार्केट म्हणून देखील आपली गणना नव्हती. म्हणजे मला माहिती नाही, पण असलं काही लॉजिकल आणि माहितीपूर्ण तुमची भक्तमंडळी आमच्यासमोर सहजपणे आणत नाही. येतात ते तुमचे संतत्वाचे आणि भक्तीचे उमाळे. त्यात काही आपल्याला इंटरेस्ट नाही.
हा तर मुद्दा चरख्याचा आहे आणि सगळ्या प्रतिकांमधून तुम्ही साधलेल्या राजकीय संप्रेषणाचा किंवा जनसंवादाचा आहे. लोकसंग्रह करावयाचा आणि त्याला क्रियाशील करायचे, त्यासाठी बहुसंख्य लोकांना सहजपणे करता येईल असा कार्यक्रम देणे आवश्यक असते. लोकसंग्रह आणि संघटनशास्त्रामधील अगदीच बेसिक नियम. चरखा कातण्यासारखं कुणालाही करता येणारं, खादीसारखं क्रांतिकारी फिलिंग देणारं सोप्पं काम तुम्ही स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलं. भगतसिंह किंवा सावरकरांचा मार्ग चोखाळणं प्रत्येकाच्या आवाक्यातलं नव्हतं. इतक्या मोठ्या समर्पणाची तयारी सगळ्यांची नसते. पण, सोप्पं काम दिलं की लोकं आपल्याला जास्त प्रतिसाद देतात हे तुमच्यातील लोकनेत्याने अचूक ओळखलं होतं. प्रभावीपणेही राबविलंही. तुमचं यश सगळ्यांसमोर आहे.  बॉस, आपकी इस अदा पें हम फिदा है! याला जोड तुमच्यातील व्यवस्थापन कौशल्याचीही. माणसांपासून ते संसाधनांपर्यंत, आश्रमापासून ते काँग्रेसपर्यंत सगळ्यांचच व्यवस्थापनही अभ्यासण्यासारखं वाटत राहतं
इतका मोठा देश, कम्युनिकेशनची कोणतीही प्रभावी साधनं नसताना स्वत:शी जोडून घेणे, हा जोक नव्हता. यू डीड इट.! इतका जबरदस्त पॉलिटिकल कम्युनिकेटर आपल्या देशाने आजवर बघितलेला नाही. सो आपला सलाम, तुमच्यातील त्या चतुर राजकारण्याला, संवादशास्त्रावर अचूक पकड असलेल्या व्यक्तीला.
तर, मि.गांधी, भेटत राहूच. तुम्हीही भेटत राहा. भक्तांची रांग जेथे संपेल, तिथून थोड्या दूर अंतरावर  उभा आहेच मी. सवड मिळाली की मिस्ड कॉल द्या नाही तर हात दाखवा. बसू गप्पा मारत.! फॉर नाऊ, बाय बाय!
…………………………………

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...