Saturday, 8 December 2018

पुलं.... असेच थांबून राहा!


पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाच्या गारुडाने घात करण्यास सुरुवात केली तेव्हा ‘टीनएजर’चा टॅग नुकताच लागला असावा. हे गारुड त्या नंतरच्या प्रत्येक पुस्तक, भाषण, ऑडियो आणि व्हिडियोगणिक वाढत गेले. त्यानंतरच्या किमान दहा वर्षात ‘देशपांडे’ नामक या व्यक्तीने आयुष्यात धूमाकूळ घातला होता. बाजीप्रभूंच्या स्मरणाने बाहू फुरफुरले असतील तर या देशपांड्यांच्या वाचनाने बुद्धीला आणि भाषेला तरतरी येत गेली. आयुष्य जसजसे पुढे जाते तसतसे मागे सुटलेल्या वाटांकडे असोशीने बघणे वाढत जाते. आपल्या गावातील घराकडे कसे आसुसून बघत असतो आपण! वय चाळिशीकडे झुकत असताना आणि डोक्यावरचे ‘सिल्वर लायनिंग’ वाढत असताना, ‘पुलं’ कडे वळून बघणे हे असेच असोशीचे आहे.

कामाच्या धबडग्यात कोपऱ्यात किंवा पलंगाखाली ठेवलेल्या बॅट-बॉलचे विस्मरण झाले असते. मग मध्येच कधीतरी आई किंवा बायको साफसफाईचे काम सांगते. वाढत चाललेले पोट आणि अकडलेली कंबर सावरत वाकल्यावर पलंगाखालची बॅट-बॉल नजरेस पडते. तो आनंद शब्दात सांगता येत नाही. किंवा ती रुखरुखही असते. आज, इंग्रजी-मराठी, रिअलिस्टिक, फिक्शन, पुरोगामी प्रचारकी किंवा जडजंबाळ काहीतरी वाचत असताना मध्येच टीनएजमध्ये गवसलेल्या ‘पुल’ नामक ठेव्याची आठवण येते. बॅट-बॉलवाले फिलिंग पुलंच्या आठवणीने जागे होते.

पुलंचे पहिले वाचलेले पुस्तक म्हणजे ‘असा मी असामी’.  माझ्या मामांकडे गेलो असताना त्यांच्या संग्रहात मिळालेले पुस्तक. एक किंवा दोन दिवसात ते वाचून काढले आणि त्या नंतर या देशपांडेशाहीचा अंमल सुरू झाला. पुस्तके विकत घेण्याचा आणि घेऊन देण्याचा शिरस्ता आमच्या घरी आता तिसऱ्या पिढीतही पाळला जातोय. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ‘जादूची चटई’, ‘महेश उडाला भुर्रर्र’ अशी खरेदी थांबली होती त्याच काळात घरात ‘फास्टर फेणे’च्या जोडीने ‘पुल’ येऊ लागले. त्यांच्या पुस्तकातील मध्यमवर्गीय माहोल डोळ्यासमोर चित्रे निर्माण करू लागला. वर्णन कसे करावे, शब्दांचा वापर कसा करावा, शब्दांच्या निरनिराळ्या अर्थांचा चमत्कृती, लेखनात त्यांचा कसा वापर करावा अशा अनेक गोष्टी रुजत गेल्या. तिरकस नजरेने एखाद्या गोष्टीकडे कसे बघावे, विरोधाभासातून होणारी गंमत कशी टिपावी, गंभीर बाबीमागे दडलेला विनोद कसा समजून घ्यावा हे कळू लागले ते याच पुलंच्या लेखनातून. हे सगळे करतानाही भाषा सहजसोपी कशी राखावी याचे सुरुवातीचे धडे कदाचित याच काळात बुद्धीच्या कोपऱ्यात रुजत गेले असावेत असे आता जाणवत राहते. विशेषत: पत्रकारिता करताना सोपे, सहज आणि लहान वाक्ये लिहिण्यावर सातत्याने भर दिला जातो. शेवटपर्यंत आपल्याला असं सोपं लिहिता येतंय की नाही याचा संभ्रम कायम असतो. या बाबत ज्या ज्या वेळी शंका निर्माण होते त्या त्या वेळी पु. ल. देशपांडे यांची आठवण् येते.  सोपे लिहीत असतानाही शब्दांचे खेळ, त्यांचे लालित्य, त्यांच्यातील अर्थवैविध्यता, त्यातून निर्माण होणारी गंमत हे ही जपता आले पाहिजे असे वाटत राहते. ते करायचे तर शब्दसाठा जितका समृद्ध हवा आणि तितकाच तो चपखलपणे लिखाणातून उतरायलाही हवा. हे असे वाटण्यामागील प्रेरणा नि:संशयपणे पुलंच आहेत. संशोधनाच्या पद्धतीने त्यांचे साहित्य कधीही न अभ्यासले नाही. मात्र या गोष्टी थोड्याफार जमू लागल्या हे त्यांच्या लिखाणाच्या वारंवारच्या वाचनातूनच आले आहे.

साधीसोपी वाक्यरचना करतानाही एखादे शब्दचित्र कसे उभे करावे याचा वस्तुपाठ त्यांच्या प्रत्येक लिखाणातून येत राहतो. पत्रकारितेच्या मागच्या १३-१४ वर्षांच्या काळात सातत्याने मुलाखती घेत आलो आहे.  या मुलाखती लिहिताना त्या त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आपल्या लिखाणातून उभे राहावे याची काळजी वाटत राहते. आणि या काळजीतून ज्या वेळेस लिखाण सुरू होते त्या प्रत्येक वेळी अनाहूतपणे संदर्भ असतात ते पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीची! त्यातील एकेक व्यक्तिरेखा म्हणजे अभ्यासावी आणि वारंवार अभ्यासावी अशीच आहे. त्याचा परिणाम निश्चितपणे आपल्याही लेखनावर होत राहतो. एखादी व्यक्ती बसते, उठते, चालते कशी, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, हालचाली, एखाद्याची विचार करण्याची पद्धत कशी असेल हे सगळं टिपलं पाहिजे. टिपलेलं हे सगळं आपल्या लिखाणात आलं पाहिजे आणि आलंच तर ते कसे यावे तर मग ‘पुलं’ सारखे यावे, ही सगळी विचारप्रक्रिया मनात ठसली आहे. व्यक्तिआधारित लेखनाचा आदर्श किंवा वस्तुपाठ कोण असावा तर पु. ल.  देशपांडेच इतका त्यांचा प्रभाव जवळपास दोन दशकांनंतरही टिकून आहे.

पत्रकारांसाठी किंवा कोणत्याही लेखनासाठी निरीक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ते जितकं चांगलं तितक्या अधिकाधिक गोष्टी तुम्हाला तुमच्या लेखनातून मांडता येतात. ‘पुलं’ या दृष्टीने अभ्यासणं हे देखील रंजक आहे. चितळे मास्तरांच्या कोट-टोपीपासून ते त्यांच्या फाटक्या चपलेपर्यंत, सखाराम गटणेच्या डोक्यावरून टोपीपासून ते पेस्तनकाकांपर्यंत प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर खणखणीतपणे उभी राहते. त्यांच्या कोणत्या तरी लेखात त्यांनी ‘मठ्ठ गोदी’ असा शब्दप्रयोग केला होता. त्यातून जे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले, ते आजही त्या प्रकारची एखादी मुलगी समोर आली की आठवून जाते अन् नको त्या वेळी अकारणच ओठांवर हसू उमटते. ऑल क्रेडिट गोज टू मि. पीएल. ! निरीक्षणाच्या या त्यांच्या ताकदीचे आजतागायत अप्रूप वाटत आले आहे.

पण, या जरा तांत्रिक गोष्टी झाल्या. सर्वात महत्वाची गोष्ट पुलंनी काय दिली असेल तर ती म्हणजे विनोद कळण्याची समज! दुसरे एक ते तिरकसपण. आणि तिसरे शब्दांशी खेळत होणारी विनोदनिर्मिती. चौथे आयुष्यात अकारण उद्भवणारे गंभीरपण. काही काही लोकांच्या आयुष्यात हे गंभीरपण जरा जास्तच डोक्यावर येऊन बसले असते. म्हणजे अशा लोकांना गंभीर राहणे आणि गांभीर्य असणे, यात फरक असतो, हेच बहुतेक कळत नाही. थँक्स टू पुलं, माझ्या मानगुटीवर हे अवास्तव गांभीर्याचे भूत मानेवर बसले नाही. अनेक कठीण गोष्टी आणि घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. आजूबाजूची परिस्थिती गंभीर असतेही. क्वचित मनावर दडपणही असते. पण, अशाही परिस्थितीत त्या घटनेतील गंमत टिपण्याची क्षमता थोडीफार अंगी आली असेल तर ती पुलंच्या साहित्याच्या वाचनातून आली हे निश्चितच. पहिल्या संस्कारांचे श्रेय पुलंचेच! आपल्या अवतीभवती एखादा ध्येयवादी. टिपिकल माणूस दिसला की आपसूक ‘सखाराम गटणे’  आपल्याला आठवतो, घरोघरी खपणारे नारायण आपण टिपू लागतो, हे सगळे श्रेय कुणाचे., निर्विवाद पुलंचेच! दासबोध, तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी या नंतर मराठीत काही लिहिले नाही तरी चालेल, असे व.पु. काळे यांनी कुठेतरी लिहिल्याचे स्मरते. व्यक्तिरेखा मांडण्याच्या बाबतीत, व्यक्ती आणि घटनांमधील विसंगती टिपण्याच्या बाबतीत आणि त्या सगळ्यातून विनोद निर्मिती करण्याच्या बाबतीत पुलंनी केलेल्या कामानंतर पुढे काही लिहले नाही तरी चालेल.

 पुलंच्या सगळ्याच साहित्यात एक मध्यमवर्गीय वातावरण आणि जुन्या काळातील भारलेपण काठोकाठ भरले आहे. त्या काळातील मध्यमवर्गीय मूल्ये, ते संस्कार आधुनिक काळात धूसर होत चाललेले आहेत. मधल्या काही वर्षांमध्ये मध्यमवर्गीय आणि त्यातही ब्राह्मणी मूल्यांना नाकारत सुटण्याचा एक खेळ महाराष्ट्रात सुरू झाला जो आजतागायत कायम आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणात जे लोकमान्य टिळकांचे झाले ते साहित्य आणि लेखनाच्या क्षेत्रात पु.ल. देशपांड्यांचे करण्याचाही खेळ काही जणांनी खेळून पाहिले. या तथाकथित पुरोगामीपणाचा पगडा मनावर बसलाही. पण, आता सर्वत्र आक्रस्ताळेपणाचा कळस झालेला दिसत असताना पुलंच्या साहित्याचे महत्व आणखीच अधोरेखित होते. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून वाचक-श्रोते आणि प्रेक्षकांना निखळ आनंद महाराष्ट्रात सर्वाधिक कुणी दिला असेल तर तो पु.ल. देशपांडे यांनीच दिला आहे हे नाकारता येत आहे. हे सगळे करीत असताना त्यांनी स्वीकारलेली ‘एक होता विदूषक’ प्रकारची भूमिकाही अनुकरणीय ठरते. तेच मध्यमवर्गीय वातावरण, लहानसहान गोष्टींमधून आनंद शोधण्याची वृत्ती आणि गतकाळातील चांगल्या गोष्टींना आस्थेने कवटाळणे याचे अप्रूप आहेच. किंबहुना, ते सगळे पुढील पिढीपर्यंत जावे असेही आवर्जून वाटते. या सगळ्यांसाठी आयुष्यात ‘पुलं’ नावाचं भारावलेपण कायम राहावे, ही अपेक्षा अवास्तव ठरणार नाही.

पुलंनी माझ्यासह असंख्य सामान्यांच्या आयुष्यात ज्या दोन गोष्टींची सहजपेरणी केले त्या म्हणजे संगीत आणि बंगाली भाषा! माझ्यासारख्या ज्यांना शास्त्रीय किंवा कोणत्याच संगीतातील काहीच कळत नाही अशांमध्ये ख्याल, ठुमरी, रागदारीपासून सुगम संगीतापर्यंत विविध गायनप्रकारांची गोडी निर्माण करण्याचे काम जितके पुलंनी केले ते इतर कोणत्याही संगीत क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी केले नाही. हीच गोष्ट बंगाली भाषेची! म्हणजे  सशस्त्र क्रांतिकार्यामुळे महाराष्ट्राच्या मनात बंगाल वसला आहेच. त्यानंतरच्या काळात बंगाली भाषा, साहित्य, संगीत आणि अर्थात शांतीनिकेतन यांच्याबद्दलची ओढ पुलंमुळेच निर्माण झाली आहे. जग फिरून आल्यावरही अद्याप शांतीनिकेतन बघितले नाही अशी रुखरुख व्यक्त करणारेही लोक माझ्या ओळखीचे आहेत. या अवस्थेमागील कारण पुलंनी रवींद्रनाथ, त्यांच्या कलाकृती आणि शांतीनिकेतन यांच्याबद्दल मराठीतून केलेली वातावरण निर्मिती हेच आहे. हे आकर्षण इतके आहे की वेगळ्या भाषा शिकण्याच्या यादीत अद्यापही बंगालीच पहिल्या क्रमांकावर आहे.

सुरुवातीच्या काळात आपल्या रोल मॉडेल्समध्ये अनेक मान्यवरांच्या समावेश असतो. हळूहळू त्यातल्या अनेकांचे पाय मातीचेच होते हे कळल्यावर ते आकर्षण कमी होत जाते. सुदैवाने ‘पुलं’च्या बाबतीत असं काही घडलेले नाही. किंबहुना ते घडूच द्यायचे नाही. विशेषत: सध्याच्या टोकाच्या, आक्रस्ताळ्या, असंख्य विद्वेषांच्या काळात आणि मनामनात फूट पडलेल्या काळात पु.ल.देशपांडे हे मनाला आल्हाद देणारे ‘आनंदनिधान ठरतात’. मध्यमवर्गीय म्हणून हिणवा, अभिजात आहे की नाही यावर लाख चर्चा करा, आम्हाला ‘पुल’ हवे आहेतच. पुल, तुम्ही आयुष्यात असेच मस्तपैकी अस्ताव्यस्त पसरलेले राहा. माझ्याच नाही तर माझ्या पुढच्या आणि त्याही पुढच्या पिढीपर्यंत असेच कायम राहा! आम्हाला तुम्ही हवेच आहात!

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...