Wednesday, 5 June 2019

कुशीत कूर्गच्या आणि कावेरीच्या




अॅनाकोंडा, गॉडझिला किंवा त्या छापाचे चित्रपट आठवतात का? पडद्यावर काहीसा गूढ अंधार, अजगरासारखं शांत पडलेलं खोल पाणी, आजूबाजूला घनदाट झाडी अन् जंगल. घरात करमत नसल्यामुळे अॅडव्हेंचरला जाऊन फुकट जीवाला घोर लावून घेणारे गोरे आणि गोऱ्यांची पोरे. सगळं व्यवस्थित चाललं असताना मध्येच तो अॅनाकोंडा अवतरतो. पडद्यावर आणि थेटरात सगळ्यांचे जीव वर-खाली करायला सुरुवात करतो. नोटाबंदीनंतर आपले पंतप्रधान ज्या-ज्या वेळी टीव्हीवर येऊन ‘मित्रों’ म्हणाले तेव्हा अनेकांचा जीव असाच वर-खाली व्हायचा. ते एक असो. मुद्दा अॅनाकोंडाचा आहे. तर तो महाप्रचंड साप, त्याच्या अवतीभवतीचं गूढ वातावरण आणि टॉप शॉटसमधून दिसणारं, दूरवर पसरलेलं गर्द हिरवं जंगल. नव्वदीत आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला  डब केलेल्या फिरंगी चित्रपटांनी भारतात धुमाकूळ घातला होता. महाअजस्र प्राणी आणि ‘जॉन, वहाँ पर कुछ है’ असे डिस्कव्हरी छापाचे डबिंग असलेले हे पिक्चर फुल्ल माहोल पिटत होते. त्या चित्रपटांनी दाखविलेले जंगलांचं गूढ रूप तुम्हाला आठवत राहतं, ते गर्द काळपट हिरवेपण तुमच्या अवतीभवती पसरलेले असतं, तुम्ही कूर्गमध्ये असता! कर्नाटकातल्या कूर्गमध्ये.
उत्तर केरळला लागून असलेलं, कर्नाटकातील इतर शहरांपेक्षा पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेने जवळ असलेले कूर्ग.  राहुल गांधी यांनी अमेठीतून रणछोडदास होत जेथून लोकसभा निवडणूक लढवली, ते केरळातील वायनाड हे कूर्गपासून तीन तासांच्या अंतरावर. सरकारी जिल्हा कोडागू. उटी, म्हैसूर यांच्या तुलनेत कूर्ग तितकंसं पर्यटकांमध्ये अद्याप लोकप्रिय नाही. म्हणजे मागील दशकभराच्या कालावधीत कूर्गचं नाव लोकांपर्यंत पोहोचू लागलंय. आम्ही कूर्गला जाणार म्हटल्यावर नेमकं कुठाय ते, काय आहे तिथे बघण्यासारखं वगैरे प्रश्न आपसूकच येत होते.  मुळात कूर्ग नावाचं ठिकाण असं काही अस्तित्वात नाही. मडिकेरी हे या जिल्ह्यातलं मुख्य गाव. प्रशासकीयदृष्ट्या महत्वाचं. पण, लोकांचं कूर्गकडे लक्ष जाण्याचं कारण येथे जिकडेतिकडे पसरलेलं जंगल आणि आल्हाददायक वातावरण. कूर्गमध्ये जंगल आहे म्हणण्यापेक्षा हा अख्खा जिल्हाच जंगलात वसवला आहे, असे म्हटले तर तो ‘जुमला’ठरू नये. खरं तर मला अतिशयोक्ती शब्द वापरायचा होता, पण ते एक असो.
बंगलोरहून निघाल्यावर म्हैसूरला मागे टाकत आपण मडिकेरीला पोहोचू शकतो. मुळात म्हैसूर हेच एक सुंदर शहर आहे. पण, कूर्गची हवा वेगळी. समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंचीवर रेनफॉरेस्टने व्यापलेलं हे ठिकाण. वळणदार रस्ते, ज्या रस्त्याने जाल तिकडे आजूबाजूला उंचच उंच वाढलेली झाडं, साथीला नारळ आणि कॉफी. ज्यांनी हिमालय बघितला आहे त्यांना येथील वळणदार रस्त्यांचे आणि थंडीचे फार काही वाटणार नाही. पण,  ही तुलना केली नाही तर आनंदात आणखी थोडी भर पडेल हे निश्चित.
सुरुवातीला उल्लेख केला तशी अॅनाकोंडाची आठवण करून देणारी ठिकाणी कितीतरी सापडतील. निसर्गधामसारखं वन विभागाने विकसित केलेलं ठिकाणं असो की हत्तींसाठी विशेषत: बनविलेला दुबारे एलिफंट कॅम्प! कूर्गला कावेरी नदीचं वरदान लाभलंय. मुळात कावेरी नदीचा उगमही याच जिल्ह्यातला. तालकावेरी येथील डोंगरातून ही नदी उगम पावते. तिथे आता मंदिर उभं राहिलंय आणि आजूबाजूला दूरवर पसरलेली घनदाट अभयारण्य हा प्रदेशच संरक्षित जंगल म्हणून जाहीर करण्यात आला आहे. येथून निघालेली कावेरी जिल्हाभर बागडत राहते. निसर्गधाम हे छोटंस बेट तिनंच निमाण केलेलं. अॅनाकोंडावालं फिलिंग देणारं. दुबारे एलिफंट कॅम्प म्हणजे लहान मुलांसाठी आणि लहानांसारखं मन असणाऱ्यांसाठी मज्जेचं ठिकाण. २०-२५ लहानमोठे हत्ती, कावेरी नदीत त्यांच डुंबणं, त्यांच्या सेवेत असलेले आणि या महाकाय प्राण्याला मुठीत ठेवू बघणारे माहूत यांचं हे विश्व. या कॅम्पवर जाण्यासाठी कावेरी नदी ओलांडून जावं लागतं.  नदी फुल फॉर्मात असते तेव्हा बोटींनी कॅम्पपर्यंत जावं लागतं. आम्ही गेलो तेव्हा पाणी बरेच कमी होते आणि नदीतील दगड वर आलेले. तरीही वेगवान, खळाळत्या कावेरीतून, पाण्यातून आणि दगडांवरून तोल सावरत जाणं म्हणजे सही मजा. काळपट, हिरव्या रंगाच्या कावेरीतून पावलं टाकत आपण हत्तींच्या राज्यात पोहोचतो. हत्तींना चारा खाऊ घालणं, त्यांच्या अंगावर पाणी घालणं, त्यांनी सोंडेतून उडविलेला फवारा आणि त्याचा आपल्या अंगावर होणारा अभिषेक! रोजच्या जगण्यात आपण लहान-सहान आनंदांना पारखे झालो असतो. काहीतरी वेगळं घडावं म्हणून आस धरून बसतो आणि डिजिटल थ्रिल किंवा आनंद शोधत बसतो. हत्तींच्या सान्निध्यात केलेली मस्ती तुमच्यातील लहानपणाला पुन्हा जागं करते. खळखळणारी कावेरी तुमच्यातील अवखळपण पुन्हा एकदा जागवते. कावेरीच्या काठाने पसरलेली मोठाली झाडं आणि वेली नदीच्या पाण्यावर सावली धरून उभी असतात.  त्या सावलीचा थंडगारपणा आपल्याही मनावर पडत जातो.  कावेरीच्या भवताल पसरलेला शांतपणा आपल्यात भिनत जातो. निसर्ग आपल्या जवळ येऊन उभा ठाकतो. कूर्गच आणि कूर्गच्या कावेरीचं दर्शन सार्थक होतं. समाधान आणि आनंद सोपा-सोपा होऊन मिळत राहतो. आपण थबकलो असतो, पण कावेरी नाही आणि तिचा प्रवासही नाही.
..........................

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...