Friday, 10 April 2020

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे



परवा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा एक व्हिडियो व्हायरल झाला होता. इटलीमधील लेखिकेच्या पत्राच्या अनुवादाचे त्यांनी वाचन केले होते. पण, या सिद्धहस्त अभिनेत्रीचा हा व्हिडियो बघितल्यावर एक प्रचंड भीतीची, निराशेची भावना निर्माण होते. या उलट, अमिताभ बच्चन यांच्यासह देशभरातील इतर अनेक कलाकारांना घेऊन दुसरा एक व्हिडियो तयार करण्यात आला होता. तो मात्र अत्यंत सकारात्मक होता आणि धीर देणाराही. बर्वे यांनी काय सादर करावे ही निवड अर्थात त्यांची आहेच. पण मुद्दा येथे सकारात्मकतेचा आहे. सध्या संकटकाळात आपल्या विचारांमधून, कृतीतून काय पेरायचंय, हा या मागचा विचार आहे.

आणि येथेच सामान्य माणसाच्या मदतीला भारतीय विचार, पद्धती आणि अगदी कर्मकांडेही मदतीला धावून येतात. घरी बसून काही न करता करोनाच्या बातम्या वाचणे आणि त्या संबंधित आकडेवारीचा रोज मागोवा घेत राहणे काहींसाठी रंजक असेलही पण बहुतेकांसाठी नाही. आणि त्यातून भीती आणि नकारात्मकता रुजतच नाही असे कुणी छातीठॊकपणे सांगू शकणार नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला व्यग्र ठेवणे, ते ही सकारात्मक गोष्टींमध्ये, हे अत्यंत आवश्यक आहे. या करिता भारतीय संस्कृतीने आपल्याला अनेक पर्याय सहज उपलब्ध करून दिले आहे. आपले धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक साहित्य अशी सकारात्मकता आपल्यात पेरत जाते. आता प्राचीन साहित्य म्हणजे चमत्कारांच्या कथा नव्हे. अर्थात त्यातूनही अनेकांना समाधान मिळते आणि ते मिळूही दिले पाहिजे. तॊ दैववाद आहे हे मान्य करुनही!

पण, भारतीय साहित्य या पलीकडे बरेच काही आहे. आधुनिकीकरणाकडे जाताना आपण जगभराचे साहित्य आत्मसात करत गेलॊ पण काहीसे आपल्याच आध्यात्मिक साहित्याकडे दुर्लक्ष झाले. रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा या सर्वज्ञात साहित्यापासून इतर अक्षरश: हजारो गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे. आवड, पिंड, कल, पातळी या प्रत्येक गॊष्टीनिहाय हे साहित्य उपलब्ध आहे. आणि त्याच्या वाचनातून आपल्यात काय पेरले जाते तर ती सकारात्मता! संकटकाळातही निभावून जाईल हा विश्वास. नकारात्मकतेचा स्पर्शही आपल्याला हॊऊ शकत नाही इतकी शक्ती या प्राचीन भारतीय पारंपारिक साहित्यात आहे. आणि हे मी शुद्ध वैचारिक ठेव्याबद्दल बोलतॊ आहे. चमत्काराच्या कथांबद्दल नाही.

ही सकारात्मकता आपल्या जीवनशैलीने आणि या विचारांच्या नकळत आपल्यावर झालेल्या संस्कारांनीही भारतीयांच्या आयुष्यात पेरली आहे. माझा एक मित्र म्हणतॊ,’ आपण भारतीय फार चिवट आहोत’. हे जे चिवटपण आहे ते या पोषणातून आले असावे असे वाटत राहते. भारतीय परंपरांना दैववादी म्हणून नाकारता येऊ शकते. पण, त्यातून भारतीयांमध्ये दीर्घकाळ वाट बघण्याची तयारी, संयम पेरला आहे हे ही नाकारता येत नाही. तो भक्तीमार्गातून, देवाच्या आराधनेतून रुजला असला तरी त्या मागचे तत्त्व हे शुद्ध आध्यात्मिक आहे. आणि कदाचित कुणाला पटणार नाही पण त्यातून सकारात्मकता आपोआप तुमच्यात रुजत जाते.

बुद्धीवादाचे समर्थक यास दैववादाचा अनाठायी अट्टाहास म्हणून नाकारू शकतात. पण खरे तर असे नाही. केवळ बुद्धीच प्रमाण मानली तर त्या निकषावरही भारतीय साहित्य तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करते.

'सदा सर्वदा देव सन्निध आहे

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे'

हे सांगणारा समर्थांचा श्लोक दैववाद सांगत नाही. तो  संकटकाळातही स्थिरबुद्धीने वाटचाल करीत राहण्याचे, संयमाचे आणि अर्थात सकारात्मकतेचे महत्व सांगत असतो. आपण, या विचारांकडे डोळसपणे बघत नाही हा आपला दोष, त्या साहित्याचा नव्हे. आणि हा तर केवळ एक श्लोक आहे. अशा अगणित गोष्टी सांगता येतील.

’बाहेर जाणे बंद असताना आत डोकावण्याची उत्तम संधी आहे’ या अर्थाचा एक मेसेज खूप प्रसृत झाला आहे. भारतीय आध्यात्मिक साहित्य हे अशा आत डोकावण्याचे साठीचे उत्तम साधन आहे.

........................................

Sunday, 5 April 2020

सिंफनी- ओळख पाश्चात्य संगीताची



भारतीय संगीत कोणत्या ना कोणत्या स्वरुपात आपल्यापर्यंत स्वाभाविकपणे पोहोचत असते. कधी ते शास्त्रीय संगीत म्हणून तर कधी लोकगीत म्हणून. पाश्चात्य संगीताची मात्र आपली फारशी सलगी नसते, माझ्यासारख्या अनेकांची तर तोंडओळखही नसते. आपल्या भोवतालच्या वातावरणातून ते स्वाभाविकपणे आपल्यापर्यंत येत नाही. आपल्यातील बहुतांश लोक पाश्चात्य संगीताच्या त्या वैभवाला मुकले असतात. आरडाओरडा आणि ठणठणाट म्हणजे केवळ पाश्चात्य संगीत नव्हे हे आपल्यापर्यंत पोहोचलेच नसते. ते ऐकून त्यातील सौंदर्य कसे अनुभवावे ही जाण माझ्यासारख्या अनेकांची विकसित झालेली नसते. पण, पाश्चात्य संगीत समजून घेऊन त्यातला आनंद घेणारेही दर्दी असतात आणि त्यांना त्यातले चांगले-वाईटही कळत असते. जागतिकीकरण आणि त्यातही स्मार्ट्फोनच्या काळात जगभरातील संगीत प्रचंड गतीने आणि मोठ्या प्रमाणात पोहोचले. पण, हे सगळे नव्हते तेव्हाही आपल्याकडे पाश्चात्य संगीताचा कान विकसित झालेले लोक कमी संख्येने- मुख्यत्वे मोठ्या शहरांतील- का असेना पण होतेच. पण माझ्यासह अनेकांना पाश्चात्य संगीत हे काहीसे अगम्यच असते. अशांना पाश्च्यात्य संगीताची तोंडऒळख सोप्या शब्दांत करून देण्याचे काम अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित ’सिंफनी’ हे पुस्तक करून देते.

पाश्च्यात्य संगीताची सुरुवात आणि विकास चर्चच्या सानिध्यात झाला. युरोपात गाजलेले अनेक संगीतकार, वादक आणि गायक हे चर्चच्या छत्राखाली आणि सान्निध्यात आपल्या संगीताची आराधना आणि काम करीत होते. किंबहुना, पाश्चात्य संगीताचा सुरुवातीचा मोठा कालखंड हा चर्चच्या आधाराने विकसित झाला आहे. सिंफनी हे पुस्तक या संपूर्ण कालखंडाविषयी विस्ताराने माहिती देते. मध्ययुगापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत असा पाश्चात्य संगीताचा वेध हे पुस्तक घेते. बाख, बीथोवन, मोझार्ट यांच्यापासून ते एल्विस प्रिस्ले, बीटल्स आणि मायकेल जॅक्सनपर्यंत अनेक दिग्गजांची कारकीर्द, त्यांचे काम, आयुष्यातील चढ-उतार आणि यशापयश असा सगळा पट पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जातो. पाश्चात्य संगीतातील अनेकविध संज्ञाही पुस्तकात दिल्या आहेत. थोडक्यात पाश्चात्य संगीताविषयी रस निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करते. अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांत भरगच्च माहिती असते, त्याचा  प्रत्यय येथे देखील येतो.

वर उल्लेख केलेल्या महान संगीतकारांची चरित्रेही विस्ताराने आणि चांगल्या पद्धतीने दिली आहेत. किंबहुना, तो या पुस्तकातील सर्वात रंजक भाग असावा. संगीतकारांची कारकीर्द आणि त्यांचे जीवन यांच्या वर्णनाच्या ओघात युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीचे ओझरते दर्शन आपल्याला घडत जाते.

विविध कालखंडात विभागणी करून पाश्चात्य संगीताची माहिती पुस्तकात देण्यात आलेली आहे. ती वाचताना आपण त्या जगाकडे निश्चितच खेचलॊ जातो. मात्र, सुरुवातीच्या काळातील संगीतावरील लेखन कदाचित पुरेशा ताकदीने संपादित झालेले नाही आणि काहीशा तुटकपणे मांडले गेले आहे असे वाटत राहते.

पाश्च्यात्य संगीताचा कालखंड हा मध्ययुगापासून या पुस्तकात गृहित धरण्यात आला आहे. इ.स. पूर्व ५०० च्या आधी ’ अंधार युग’ होते असेही मानले जाते. जवळजवळ नवव्या शतकापर्यंत युरोपियन चर्च संगीत आणि या वादन कला प्रकाराला ’सैतानाची कला’ म्हणून संबोधत होते. भारतीय़ संस्कृतीत संगीताचा माग काढला तर आपण अगदी वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. भारतीय संगीताला किमान चार हजार वर्षांचा इतिहास आहे यासारखे उल्लेखही सुखावणारे आहेत. राजे आणि श्रीमंताच्या आश्रयाने संगीताचा विकास झाल्याचे दाखले आपल्याकडे दिसतात. असाच प्रकार पाश्चात्य जगातही होता.

कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य बघावे की बघू नये हा नेहमीच वादाचा विषय असतो. गाजलेल्या पाश्चात्य संगीतकारांचे आयुष्य भारतीय मानकांनुसार कसे विस्कळित आणि अस्थिर होते हे ही पुस्तकातून जाणवत राहते. किंबहुना, ते वाचताना जागोजागी अलीकडेच येऊन गेलेल्या ’उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाची आठवण येत राहते.

सिंफनी हे पुस्तक पाश्चात्य संगीताकडे आकर्षित करणारे निश्चितपणे आहे. ज्यांनी ते अद्याप ऐकले नाही त्यांनी तशी सुरुवात करण्याची मनोभूमिका हे पुस्तक तयार करून देते. याच पुस्तकातील काही वाक्ये उद्धृत करून शेवट करतो.

’संगीत आपले आयुष्य सुंदर आणि समृद्ध करायला मदत करते. संगीत आपल्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मर्यादांच्या पलीकडे नेते. शरीर-मन-आत्मा यांना एकत्र आणते. आपल्या अंतर्मनाला बाह्य स्वरुपात व्यक्त होण्यास मदत करते. आनंद, राग आणि  दु:ख या तिन्हीमध्ये संगीत साथ देतं. आत्मिक समाधानाची अनुभूती म्हणजे संगीत!’

अशी अनुभूती ज्याला ज्या संगीतातून मिळेल त्याने ती तिथून घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते भारतीय असो, पाश्चात्य किंवा मग दोन्हीही!

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...