काही वर्षांपूर्वीचे अण्णा हजारेंचे आंदोलन आठवतेय का? तत्कालीन केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. आणि केवळ दिल्ली-मुंबईत नव्हे तर देशाच्या प्रत्येक शहरात, तालुक्यात विद्यार्थी तिरंगा हाती घेऊन एकत्र येत होते, मोर्चे काढत होते आणि देशातील भ्रष्टाचाराचा शांततापूर्ण निषेध करीत होते. पण, आज हे आठवण्याचे कारण काय? कारण हे की आज ४ जून आहे आणि जगाच्या इतिहासात आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या नरसंहाराचा म्हणून ओळखला जातॊ. चीनमधील त्यानेनमेन नरसंहाराचा.
आंतरराष्ट्रीय राजकारणात क्रौर्याचे दाखले नवीन नाहीत आणि चीनसाठी तर नक्कीच नाही. त्यानेनमेनमधील विद्यार्थीसंहार हे एक ठळक आणि तुलनेने अलीकडचे उदाहरण. पण त्याआधीही, माओंच्या सांस्कृतिक महाक्रांती किंवा लांब उडीसारख्या प्रयोगातील हजारॊ मृत्यू आणि चॅंग कै शेकच्या राजवटीत झालेले अत्याचार हा देखील ताजाच इतिहास. अगदी गेल्याच शतकातील. त्यामुळे, नरसंहार, क्रौर्य आणि चीन हे कायमच एकमेकांत गुंफलेले समीकरण आहे. तुलनेने प्रचंड शांततेत जगणार्या बहुसंख्य भारतीय़ांच्या कक्षेपलीकडील.
त्यानेनमेन चौकातील नरसंहार ही एका रात्रीतून घडलेली घटना नव्हती. ४ जून १९८९ रोजी हा हिंसाचार घडला असला तरी त्याची पाळेमुळे किमान १० वर्षांपासून चीनमध्ये रुजत होती. १९७९ पासूनच चीनमध्ये लोकशाहीची मागणी आणि ती करणार्यांना शिक्षा सुरू झाल्या होत्या. माओत्तर आणि डेंग झाओपिंग यांचा हा काळ. खुली अर्थव्यवस्था आणि आर्थिक सुधारणा यांनी लोकशाहीचेही वारे चीनमध्ये आणले होते आणि त्याचा परिणाम तरुणांवर होत होता. भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, पारदर्शकता या प्रमुख मुद्द्यांना घेऊन चीनमध्ये १९८९ साली विद्यार्थ्यांनी आंदोलनांना सुरूवात केली होती. दशकभर साचत आलेल्या या भावनांचे विशाल स्वरुप १९८९ मध्ये त्यानेनमेन चौकात प्रत्ययास येत होते. मे महिन्यापासूनच अनेक विद्यार्थी, नागरिक आणि कामगार या चौकात एकत्र येत होते. किती मोठा जमाव असावा हा? तेव्हाचे रशियाचे प्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह हे नेमके त्याच वेळेस चीनच्या दौर्यावर आले होते. १५ मे १९८९ रोजी ते बीजिंगला पोहोचले तेव्हा त्यानेनमेन चौकात तब्बल १० लाख तरुण जमले होते अशा नोंदी आहेत. रशियन राष्ट्रप्रमुखासमोर ही सगळी निदर्शने सुरू होती आणि चीनचे तत्कालिन सरकार हतबलपणे बघण्याशिवाय इतर काहीही करू शकत नव्हते. राजकीयदृष्ट्या अत्यंत नाट्यमय असलेल्या या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातील पाश्चात्य माध्यमांचे प्रतिनिधी बीजिंगमध्ये हजर होते आणि लगोलग बातम्या पोहोचवीत होते. गोर्बाचेव्ह रशियाला परतल्यानंतरही ही निदर्शने सुरूच होती आणि त्यांची तीव्रता सातत्याने वाढत होती. चीनी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालिन सचिव झाओ झियांग यांच्यासारख्या काही नेत्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा, आंदोलन संपविण्याचा सल्ला दिला, मध्यस्थीही केली. पण, हे निर्नायकी आंदोलन काही संपले नाही. अखेर, चीनचे तत्कालिन प्रमुख नेते डेंग यांनी २० मे रोजी मार्शल लॉ लावण्याचे आदेश दिले. इतके करुनही त्यानेनमेन चौक रिकामा होत नव्हता. हजारॊंच्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक तेथे जमा होत होते. ३ जूनच्या रात्री पंतप्रधान ली फंग यांनी लष्कराला हा चौक पूर्णपणे रिकामा करण्याचे आदेश दिलेत. रणगाडे आणि चिलखती गाड्यांसह चीनी लष्कर चौकाकडे जाऊ लागले पण त्यांना मार्गात तरुण आणि नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत होता. जुन्या गाड्या, फर्निचर आणि इतर गोष्टी रस्त्यात आणून टाकल्या जात होत्या आणि लष्कराच्या मार्गात अडथळे आणले जात होते. नागरिकांचे हे अडथळे दूर करण्यासाठी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. अगदी आपापल्या घरांच्या खिडक्यांमध्ये, गॅलर्यांमध्ये उभे असलेल्यांचेही या गोळीबारात मृत्यू झाले. रस्त्यावर मारले गेले ते वेगळेच. चीनची लोकमुक्तीसेना ही तेथील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याचे सांगितले जात असे. त्या दिवशी मात्र, बेरोजगार तरुण, कामगार, सरकारी कर्मचारी, गृहिणी, वयस्क अशा सगळ्यांचा विरोध सैन्याला झेलावा लागला आणि चिरडावाही.
सैन्याचे जवान त्यानेनमेन चौकात पोहोचले तेव्हा पहाट उजाडायला सुरुवात झाली होती. यावेळी तेथे सुमारे लाख-दीड लाख लोक उपस्थित होते, बव्हंशी तरुण. आणि सकाळ पूर्ण उजाडली तेव्हा अख्खा चौक निर्मनुष्य झाला होता. कारण, मधल्या काही तासांमध्ये शेकडॊ लोक गोळीबारात बळी पडले, हजारॊ जखमी झाले, कित्येकांनी मार खाल्ला, काही अर्धवट जखमींनाही मारले गेले. यात तरुण मुले, मुली आणि आपल्या बाळांना घेऊन आलेल्या महिलाही होत्या असे सांगितले जाते. चीनच्या सरकारने, लष्कराने आपल्याच लोकांचा नरसंहार घडवला. नेमके किती लोक मेले आणि किती जखमी झाली याची निश्चित आकडेवारी जगापुढे कधीही आली नाही. ४०० पासून ते १० हजारांपर्यंत मृतांचा आकडा सांगितला गेला आहे. पाश्चात्य माध्यमे, जपानी माध्यमे यांच्यात हा आकडा जास्त येत होता तर चीनी सरकारच्या कठॊर नियंत्रणाखाली असलेल्या माध्यमांमध्ये तो अत्यंत कमी सांगितला जात होता. शिवाय नागरिकांनी केलेल्या हिंसाचारात सैनिकही ठार झाले आणि मारले गेले.
इंटरनेटवर आपल्याला गोळीबाराचे, निदर्शनांचे काही व्हिडियोज, एक माणूस रणगाड्यांची वाट अडवत असल्याचा व्हिडियो बघायला मिळतॊ. सहजपणे वाचायला मिळते तेही सगळे इतर देशांच्या माध्यमांमधील. चीनच्या माध्यमांमधील जवळजवळ नाहीच. तिथे हे दडवले जातेच. जगभरात चीनच्या या क्रौर्याचा निषेध करण्यात आला होता. पण, रंजक बाब अशी की अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रीय़ सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर तसेच काही उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी या कृतीचे समर्थन केले होते. कारण, त्यावेळेची अमेरिकेची आंतरराष्ट्रीय राजकारणाची आणि व्यापाराची गरज वेगळी होती. जगासाठी हे तरुण लोकशाहीची मागणी करणारे आंदोलक होते, तर चीनी कम्युनिस्ट सरकारने त्यांच्यावर ’प्रतिक्रांतिकारक’ असा शिक्का मारला होता. असा शिक्का मारण्याचे काय संदर्भ असतात हे कम्युनिस्ट जगताचा अभ्यास असणारे लोक चांगल्या प्रकारे समजू शकतात.
आज या हत्याकांडाला बरोबर ३१ वर्षे झाली आहेत. नृशंस हत्यांकांडाचा हा इतिहास चीनने मागे टाकला आहे. हत्याकांड घडविणारे डेंग झाओपिंग यांच्याच धोरणांमुळे गरिबीतून चीन श्रीमंत राष्ट्र म्हणून दरम्यानच्या काळात पुढे आला. आता ही आर्थिक समृद्धी अनुभवलेली नवी तरूण पिढी जन्माला आली आहे. त्या पिढीला या इतिहासाशी काही घेणेदेणे नसल्याचे सांगितले जाते. चार दशकांचा रक्तरंजित चीन अनुभवलेल्या मध्यमवयीन आणि ज्येष्ठांना पुन्हा त्या भीषण कालखंडाकडे जाणे नकोसे वाटते. त्यानेनमेन चौकाला बायपास करून आताचा चीन वेगळ्या वाटेने निघाला आहे, असे अभ्यासक सांगतात.
पण, चीन या स्मृती विसरू बघत असला तरी जग तसे होऊ देत नाही. राष्ट्र आणि शासन म्हणून चीन कोणत्या थराला जाऊ शकतो हे अधोरेखित करण्यासाठी त्येनानमेनचा संदर्भ वारंवार पुढे येत राहतॊ. त्येनानमेनच्या स्मृती जागविणारे प्रदर्शन आयोजित करण्यावर मकाऊ प्रांताने बंदी घातल्याच्या बातम्या सध्या पुढे येत आहेत. हॉंगकॉंग आणि चीन हा संघर्ष सध्या पेटलेला आहे. मागील वर्षी ४ जूनला हॉंगकॉंगचे हजारॊ नागरिक एकत्र आले आणि मेणबत्त्या पेटवून त्यांनी त्येनानमेनच्या स्मृतींना उजाळा दिला. या वर्षी देखील तेथे मोठी निदर्शने होणार आहेत. हॉंगकॉंग हा पुढचा त्यानेनमेन चौक ठरू नये अशीही प्रार्थना आणि भीती विविध ठिकाणी व्यक्त होते आहे.
लाखो लोकांचे बळी घेणारा कोरोना व्हायरस सोडण्याचे क्रूर काम चीन करू शकतो का, असा भाबडा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या घरात विचारला जातो आहे. हा विषाणू चीननेच पसरविला आहे का हे माहिती नाही, पुरावेही नाहीत पण चीन क्रूर होऊ शकतॊ हे मात्र निश्चित. या राष्ट्राचा कम्युनिस्ट आणि बिगरकम्युनिस्ट इतिहास त्याची साक्ष देत उभा आहे. त्यानेनमेन त्याचे ठसठशीत प्रतिक आहे.
७७७५०९५९८६
http:/mandarmoroney.blogspot.com
संदर्भ:
१. ड्रॅगन जागा झाल्यावर: अरुण साधू
२. इंटरनेटवरील नियतकालिके, वार्तापत्रे, अहवाल.
..........................................
चीन आणि क्रूरता हे समानार्थी शब्द च आहेत. त्यांच्या प्राण्यांवरील क्रूरतेचे पण बरेच किस्से आहेत. युलीन डॉग फेस्टिवल याचे उदाहरण आहे.
ReplyDeleteफार छान लिहिले आहे तुम्ही. नमस्कार.
आभारी आहे. तुमचे नाव सांगता येईल का?
ReplyDeleteमाफ करा .... परन्तु चिन हा काही श्रीमंत देश म्हणता येणार नाही
ReplyDeleteचिन मधील मजुर अथवा कामगार हा बंधुवा मजदुर पेक्षा जास्त काहीही
नाही.
आत्महत्यांचे प्रमाण चिन मधे इतके आहे की नदीच्या पात्रातून प्रेत शोधून काढण्याची नौकरी सुद्धा चिन मधे मिळते
चिनी जनता सुद्धा सरकारी त्रासाला कंटाळली आहे