Tuesday, 2 June 2020

त्यानेनमेन चौकाला 'बायपास' नाही!



काही वर्षांपूर्वीचे अण्णा हजारेंचे आंदोलन आठवतेय का? तत्कालीन केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. आणि केवळ दिल्ली-मुंबईत नव्हे तर देशाच्या प्रत्येक शहरात, तालुक्यात विद्यार्थी तिरंगा हाती घेऊन एकत्र येत होते, मोर्चे काढत होते आणि देशातील भ्रष्टाचाराचा शांततापूर्ण निषेध करीत होते. पण, आज हे आठवण्याचे कारण काय? कारण हे की आज ४ जून आहे आणि जगाच्या इतिहासात आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या नरसंहाराचा म्हणून ओळखला जातॊ. चीनमधील त्यानेनमेन नरसंहाराचा.

आंतरराष्ट्रीय राजकारणात क्रौर्याचे दाखले नवीन नाहीत आणि चीनसाठी तर नक्कीच नाही. त्यानेनमेनमधील विद्यार्थीसंहार हे एक ठळक आणि तुलनेने अलीकडचे उदाहरण. पण त्याआधीही, माओंच्या सांस्कृतिक महाक्रांती किंवा लांब उडीसारख्या प्रयोगातील हजारॊ मृत्यू आणि चॅंग कै शेकच्या राजवटीत झालेले अत्याचार हा देखील ताजाच इतिहास. अगदी गेल्याच शतकातील. त्यामुळे, नरसंहार, क्रौर्य आणि चीन हे कायमच एकमेकांत गुंफलेले समीकरण आहे. तुलनेने प्रचंड शांततेत जगणार्‍या बहुसंख्य भारतीय़ांच्या कक्षेपलीकडील.

त्यानेनमेन चौकातील नरसंहार ही एका रात्रीतून घडलेली घटना नव्हती.  ४ जून १९८९ रोजी हा हिंसाचार घडला असला तरी त्याची पाळेमुळे किमान १० वर्षांपासून चीनमध्ये रुजत होती. १९७९ पासूनच चीनमध्ये लोकशाहीची मागणी आणि ती करणार्‍यांना शिक्षा सुरू झाल्या होत्या. माओत्तर आणि डेंग झाओपिंग यांचा हा काळ. खुली अर्थव्यवस्था आणि आर्थिक सुधारणा यांनी लोकशाहीचेही वारे चीनमध्ये आणले होते आणि त्याचा परिणाम तरुणांवर होत होता. भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, पारदर्शकता या प्रमुख मुद्द्यांना घेऊन चीनमध्ये १९८९ साली विद्यार्थ्यांनी आंदोलनांना सुरूवात केली होती. दशकभर साचत आलेल्या या भावनांचे विशाल स्वरुप १९८९ मध्ये त्यानेनमेन चौकात प्रत्ययास येत होते. मे महिन्यापासूनच अनेक विद्यार्थी, नागरिक आणि कामगार या चौकात एकत्र येत होते. किती मोठा जमाव असावा हा? तेव्हाचे रशियाचे प्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह हे नेमके त्याच वेळेस चीनच्या दौर्‍यावर आले होते. १५ मे १९८९ रोजी ते बीजिंगला पोहोचले तेव्हा त्यानेनमेन चौकात तब्बल १० लाख तरुण जमले होते अशा नोंदी आहेत. रशियन राष्ट्रप्रमुखासमोर ही सगळी निदर्शने सुरू होती आणि चीनचे तत्कालिन सरकार हतबलपणे बघण्याशिवाय इतर काहीही करू शकत नव्हते. राजकीयदृष्ट्या अत्यंत नाट्यमय असलेल्या या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातील पाश्चात्य माध्यमांचे प्रतिनिधी बीजिंगमध्ये हजर होते आणि लगोलग बातम्या पोहोचवीत होते. गोर्बाचेव्ह रशियाला परतल्यानंतरही ही निदर्शने सुरूच होती आणि त्यांची तीव्रता सातत्याने वाढत होती. चीनी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालिन सचिव झाओ झियांग यांच्यासारख्या काही नेत्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा, आंदोलन संपविण्याचा सल्ला दिला, मध्यस्थीही केली. पण, हे निर्नायकी आंदोलन काही संपले नाही. अखेर, चीनचे तत्कालिन प्रमुख नेते डेंग यांनी २० मे रोजी मार्शल लॉ लावण्याचे आदेश दिले. इतके करुनही त्यानेनमेन चौक रिकामा होत नव्हता. हजारॊंच्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक तेथे जमा होत होते. ३ जूनच्या रात्री पंतप्रधान ली फंग यांनी लष्कराला हा चौक पूर्णपणे रिकामा करण्याचे आदेश दिलेत. रणगाडे आणि चिलखती गाड्यांसह चीनी लष्कर चौकाकडे जाऊ लागले पण त्यांना मार्गात तरुण आणि नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत होता. जुन्या गाड्या, फर्निचर आणि इतर गोष्टी रस्त्यात आणून टाकल्या जात होत्या आणि लष्कराच्या मार्गात अडथळे आणले जात होते. नागरिकांचे हे अडथळे दूर करण्यासाठी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. अगदी आपापल्या घरांच्या खिडक्यांमध्ये, गॅलर्‍यांमध्ये उभे असलेल्यांचेही या गोळीबारात मृत्यू झाले. रस्त्यावर मारले गेले ते वेगळेच. चीनची लोकमुक्तीसेना ही तेथील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याचे सांगितले जात असे. त्या दिवशी मात्र, बेरोजगार तरुण, कामगार, सरकारी कर्मचारी, गृहिणी, वयस्क अशा सगळ्यांचा विरोध सैन्याला झेलावा लागला आणि चिरडावाही.

सैन्याचे जवान त्यानेनमेन चौकात पोहोचले तेव्हा पहाट उजाडायला सुरुवात झाली होती. यावेळी तेथे सुमारे लाख-दीड लाख लोक उपस्थित होते, बव्हंशी तरुण. आणि सकाळ पूर्ण उजाडली तेव्हा अख्खा चौक निर्मनुष्य झाला होता. कारण, मधल्या काही तासांमध्ये शेकडॊ लोक गोळीबारात बळी पडले, हजारॊ जखमी झाले, कित्येकांनी मार खाल्ला, काही अर्धवट जखमींनाही मारले गेले. यात तरुण मुले, मुली आणि आपल्या बाळांना घेऊन आलेल्या महिलाही होत्या असे सांगितले जाते. चीनच्या सरकारने, लष्कराने आपल्याच लोकांचा नरसंहार घडवला. नेमके किती लोक मेले आणि किती जखमी झाली याची निश्चित आकडेवारी जगापुढे कधीही आली नाही. ४०० पासून ते १० हजारांपर्यंत मृतांचा आकडा सांगितला गेला आहे. पाश्चात्य माध्यमे, जपानी माध्यमे यांच्यात हा आकडा जास्त येत होता तर चीनी सरकारच्या कठॊर नियंत्रणाखाली असलेल्या माध्यमांमध्ये तो अत्यंत कमी सांगितला जात होता. शिवाय नागरिकांनी केलेल्या हिंसाचारात सैनिकही ठार झाले आणि मारले गेले.

 इंटरनेटवर आपल्याला गोळीबाराचे, निदर्शनांचे काही व्हिडियोज, एक माणूस रणगाड्यांची वाट अडवत असल्याचा व्हिडियो बघायला मिळतॊ. सहजपणे वाचायला मिळते तेही सगळे इतर देशांच्या माध्यमांमधील. चीनच्या माध्यमांमधील जवळजवळ नाहीच. तिथे हे दडवले जातेच. जगभरात चीनच्या या क्रौर्याचा निषेध करण्यात आला होता. पण, रंजक बाब अशी की अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रीय़ सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर तसेच काही उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी या कृतीचे समर्थन केले होते. कारण, त्यावेळेची अमेरिकेची आंतरराष्ट्रीय राजकारणाची आणि व्यापाराची गरज वेगळी होती. जगासाठी हे तरुण लोकशाहीची मागणी करणारे आंदोलक होते, तर चीनी कम्युनिस्ट सरकारने त्यांच्यावर ’प्रतिक्रांतिकारक’ असा शिक्का मारला होता. असा शिक्का मारण्याचे काय संदर्भ असतात हे कम्युनिस्ट जगताचा अभ्यास असणारे लोक चांगल्या प्रकारे समजू शकतात.

आज या हत्याकांडाला बरोबर ३१ वर्षे झाली आहेत. नृशंस हत्यांकांडाचा हा इतिहास चीनने मागे टाकला आहे. हत्याकांड घडविणारे डेंग झाओपिंग यांच्याच धोरणांमुळे गरिबीतून चीन श्रीमंत राष्ट्र म्हणून दरम्यानच्या काळात पुढे आला. आता ही आर्थिक समृद्धी अनुभवलेली नवी तरूण पिढी जन्माला आली आहे. त्या पिढीला या इतिहासाशी काही घेणेदेणे नसल्याचे सांगितले जाते. चार दशकांचा रक्तरंजित चीन अनुभवलेल्या मध्यमवयीन आणि ज्येष्ठांना पुन्हा त्या भीषण कालखंडाकडे जाणे नकोसे वाटते. त्यानेनमेन चौकाला बायपास करून आताचा चीन वेगळ्या वाटेने निघाला आहे, असे अभ्यासक सांगतात.

पण, चीन या स्मृती विसरू बघत असला तरी जग तसे होऊ देत नाही. राष्ट्र आणि शासन म्हणून चीन कोणत्या थराला जाऊ शकतो हे अधोरेखित करण्यासाठी त्येनानमेनचा संदर्भ वारंवार पुढे येत राहतॊ. त्येनानमेनच्या स्मृती जागविणारे प्रदर्शन आयोजित करण्यावर मकाऊ प्रांताने बंदी घातल्याच्या बातम्या सध्या पुढे येत आहेत. हॉंगकॉंग आणि चीन हा संघर्ष सध्या पेटलेला आहे. मागील वर्षी ४ जूनला हॉंगकॉंगचे हजारॊ नागरिक एकत्र आले आणि मेणबत्त्या पेटवून त्यांनी त्येनानमेनच्या स्मृतींना उजाळा दिला. या वर्षी देखील तेथे मोठी निदर्शने होणार आहेत. हॉंगकॉंग हा पुढचा त्यानेनमेन चौक ठरू नये अशीही प्रार्थना आणि भीती विविध ठिकाणी व्यक्त होते आहे.

 लाखो लोकांचे बळी घेणारा कोरोना व्हायरस सोडण्याचे क्रूर काम चीन करू शकतो का, असा भाबडा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या घरात विचारला जातो आहे. हा विषाणू चीननेच पसरविला आहे का हे माहिती नाही, पुरावेही नाहीत पण चीन क्रूर होऊ शकतॊ हे मात्र निश्चित. या राष्ट्राचा कम्युनिस्ट आणि बिगरकम्युनिस्ट इतिहास त्याची साक्ष देत उभा आहे. त्यानेनमेन त्याचे ठसठशीत प्रतिक आहे.

७७७५०९५९८६

http:/mandarmoroney.blogspot.com

संदर्भ:

१.     ड्रॅगन जागा झाल्यावर: अरुण साधू

२.     इंटरनेटवरील नियतकालिके, वार्तापत्रे, अहवाल.

..........................................

Thursday, 21 May 2020

पाश्चात्यांशी चीनी बॉक्सिंग





हे असे म्हणे दर ६० वर्षांनी होते आणि निश्चितपणे होतेच. किमान चीनी मान्यतेनुसार तर घडून येतेच. म्हणजे असे की, दर ६० वर्षांनी या लाल तार्‍याच्या देशावर मोठे संकट येते. अगदी त्या देशात लाल तारा उगवला नव्हता तेव्हापासून. १८४० मध्ये ब्रिटनशी झालेले अफूचे युद्ध आणि त्यातील चीनचा पराभव, १९०० मध्ये बॉक्सर बंडाळी आणि पाश्चात्य, ख्रिश्चन फौजांनी केलेली मानहानी, १९६० मधील प्रचंड मोठा दुष्काळ, त्यापाठॊपाठ माओंची प्रसिद्ध ’लांब उडी’ आणि त्यातून ३ ते ४ कोटी लोकांचे भुकेने झालेले मृत्य़ू. एक ना अनेक आपत्ती आणि त्या ही बरोबर दर ६० वर्षांनी. आणि आता २०२० मध्ये पुन्हा एकदा करोनाने चिन्यांच्या मनातील हा अपशकुन खरा ठरविला आहे. आणि या वेळेस केवळ चीनच नव्हे तर संपूर्ण जगावर अपशकुनाचे वादळ घोंघावते आहे. अंधश्रद्धा म्हणा किंवा योगायोग, जे घडले आहे आणि घडते आहे ते जगासमोर आहे. ६० वर्षांनंतर चीन पुन्हा एकदा जागतिक मानहानीला तोंड देतो आहे.

करोना विषाणूने अवघ्या जगाला ग्रासल्यानंतर या संकटाकरिता चीनला दोषी धरणे सुरू झाले. अगदी अलीकडे पर्यंत अनेकांनी नावही न ऐकलेला चीनचा वुहान प्रांत तर सर्वतोमुखी झाला. तेथील प्रयोगशाळेतच हा विषाणू तयार झाला असावा असा दाट संशय जवळपास प्रत्येकाच्या मनात आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तर त्याचा अनेकदा जाहीर उल्लेख केला आहे, किंबहुना तशी मोहीमच उघडली आहे. इतर युरोपीय राष्ट्रे देखील उच्चरवाने चीनविरोधी सूर काढीत आहेत. आणि त्यामुळे या सगळया प्रकाराला पाश्चात्य राष्ट्रे विरुद्ध चीन अशा संघर्षाचे स्वरूप आले आहे. आपल्यावर असे संघटित आक्रमण होते आहे हे बघितल्यावर चीन तरी कसा शांत बसेल? आक्रमकता, स्वत:बद्दलचा प्रचंड अभिमान, बाहेरील टीका ऐकून न घेणे आणि इतर जगाकडे तुच्छतेने बघण्याची वृत्ती ही चीनची ऐतिहासिक गुणवैशिष्ट्ये आहे. पाश्चात्यांच्या आक्रमक प्रचाराला चीननेही आपल्या प्रचारयंत्रणेमार्फत तितकेच प्रबळ उत्तर देणे सुरू केले आहे. विविध राष्ट्रांमधील चीनचे राजदूत, प्रचारयंत्रणेतील अधिकारी, चीनी सत्ताधारी पक्षाच्या संपूर्ण नियंत्रणात असलेली वृत्तपत्रे आणि इतर माध्यमे यांनी आरोपांना केवळ प्रत्युत्तरच दिले नाही तर उलट टीकाही सुरू केली आहे. त्यामुळे, चीन आणि पाश्चात्य राष्ट्रे यांच्यातील या वाग्युद्धाचा मोठाच धडाका सध्या उडाला आहे.  अनेक देशांतील प्रसारमाध्यमांमध्ये त्याबाबतच्या बातम्या आणि लेख रोजच येत आहेत. चीनी राजदूतांनी आक्षेपार्ह वक्तव्ये दिली म्हणून फ्रान्स, कझाकस्तान, नायजेरिया आणि इतर काही राष्ट्रांनी त्यांना कडक सूचना दिल्या आहेत.

या सगळ्यातून एकीकडे पाश्चात्य राष्ट्रे आणि दुसरीकडे एकटा चीन असे दृश्य उभे राहिले आहे. चीनमध्ये याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते आहे. पाश्चात्य राष्ट्रे एकत्र येऊन, ठरवून चीनला एकटे पाडत आहेत, हे चीनी सरकारने मनावर घेतले आहे. याला चीनी भावविश्वात ऐतहासिक संदर्भ आहे आणि चीनच्या दृष्टीने तो अपमानास्पद व दुखराही आहे. चीनविरोधात उघडलेली ही आघाडी ही या नव्या महासत्तेला ’बॉक्सर बंडाची’ आठवण करून देणारी आहे आणि म्हणूनच अधिक डिवचणारी देखील.

शतकाची सुरुवात बॉक्सर बंडाळी

विसावे शतक हे चीनच्या इतिहासात ’बॉक्सर बंडाळी’ घेऊन आले. चीनच्या सगळ्या भागांमध्ये युरोपीय व्यापार्‍यांनी हातपाय पसरले होते आणि आपले वर्चस्वही निर्माण केले होते. युरोपियांनी अवघा चीन आपसातील सामंजस्याने आपल्या व्यापारासाठी वाटून घेतला असता. या राष्ट्रांनी ठरविले असते तर त्याचवेळी चीनचे तुकडे झाले असते. एकीकडे युरोपीय व्यापारी भरमसाठ नफा कमवीत असताना चीनच्या जनतेला याचा काहीही लाभ होत नव्हता. युरोपियनांच्या वर्चस्ववादाला स्थानिकांचा विरोध होता. आणि याच असंतोषाचा स्फोट झाला १९०० मध्ये, हेच ते चीनच्या आधुनिक इतिहासातील प्रसिद्ध असे बॉक्सरचे बंड.

बंडखोरांनी युरोपीय व्यापारी आणि मिशनर्‍यांवर हल्ले सुरू केले. त्याला तत्कालिन चीनी राजघराण्याची देखील साथ होती. सुरुवातीला बंडखोरांनी युरोपीयांना मोठा तडाखा दिला आणि अनेक चीनी ख्रिश्चन तसेच युरोपीय त्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्यानंतर, मात्र सर्व युरोपीय एकत्र आले, त्यांच्या राष्ट्रांच्या फौजानी त्यांना साथ दिली आणि जोरदार उत्तर दिले. इंग्रज, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी, इटली आणि अमेरिका अशा पाश्चात्य जगातील सर्वांचाच यामध्ये समावेश होता. पाश्चात्य फौजांच्या ताकदीपुढे चीनी बंडखोर टिकाव धरू शकले नाहीत. दोन्ही बाजूंनी मोठा रक्तपात झाला आणि युरोपीयांचा विजय झाला. चीनवर अनेक अपमानास्पद अटी लादण्यात आल्या. युरोपियांनी स्वत:करिता आणखी सवलती पदरात पाडून घेतल्या. या युद्धातील चीनी लढवय्ये हे बहुतांश शेतकरी होती आणि मार्शल आर्ट्स किंवा चाइनिझ बॉक्सिंग जाणणारे होते. त्यामुळे या युद्धाला ’बॉक्सर’ चे बिरुद चिकटले आहे.

चीनचा असाच अपमानास्पद पराभव १८४० च्या सुमारास झालेल्या अफूच्या युद्धांमध्ये झाला होता. त्यानंतर ६० वर्षांनी झालेल्या बॉक्सर बंडाळीतही नामुष्की आली. या दोन्ही युद्धांना चीनच्या इतिहासात मोठे मह्त्व आहे आणि खरे तर त्या ठसठसणार्‍या जखमा पण आहेत. एकीकडे बॉक्सरच्या बंडाळीकडे आस्थेने बघणारा वर्ग आणि दुसरीकडे या बंडाला काही प्रमाणात कमी लेखणारा वर्ग आजही चीनमध्ये आहेच. थोडेफार आपल्याकडील १८५७ च्या उठावासारखेच. आज करोनाच्या काळात चीन विरुद्ध इतर पाश्चात्य राष्ट्रे असा उघड संघर्ष सुरू आहे. या संघर्षालाही ’बॉक्सर बंडाळी’ सारखा संदर्भ जोडण्यात येतॊ आहे. मात्र, गेल्या शतकाच्या सुरुवातीला झाला तसा अपमान यावेळी होऊ द्यायचा नाही ही खबरदारी चीनने घेणे सुरू केले आहे. आणि म्हणूनच त्याने पाश्चात्य राष्ट्रांच्या तोडीस तॊड प्रचार चालविला आहे. बॉक्सरचा हा संदर्भ देणारी अनेक विश्लेषणे सध्या जगातील माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत आणि त्यातून चीनच्या या पैलूकडे अभ्यासक अंगुलीनिर्देश करीत आहेत.

पण, या वेळी चीनची इतिहासात झाली तशी मानहानी होईल का, या बाबत सगळ्यांना शंका आहेत. करोनामुळे आजघडीला जरी चीनबाबत संपूर्ण जगभर नाराजीची भावना असली तरीही या नव्या संभाव्य महासत्तेला थेट आणि दीर्घकाल दुखावण्याची हिंमत फारशी राष्ट्रे करणार नाहीत. भारताने देखील चीनला धारेवर धरलेले नाही. कारण, सगळ्याचे मूळ हे चीनची आर्थिक आणि सामरिक सत्ता आहे. शिवाय, करोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय साहित्याची मदतही अनेक राष्ट्रांना चीनकडून मिळते आहे. एकोणविसाव्या किंवा विसाव्या शतकात होता तसा विखुरलेला, ढेपाळलेला चीन आता राहिलेला नाही. तेव्हा अपमान सहन करावा लागला, मात्र आता तॊ करणार नाही. आणि मनातील सल तर कधीही जाऊ देणार नाही. तॊ चीनी स्वभावच नाही. एकीकडे वैद्यकीय साहित्याची मदत आणि दुसर्‍या बाजूला आक्रमक प्रचार या आयुधांनी चीनने स्वत:चा ’नॅरेटिव्ह’ उभा करणे सुरू केले आहे. अमेरिका आणि युरोपची सध्याची अवस्था वाईट आहे आणि त्यामुळे भविष्यातील उगवता सूर्य पूर्वेकडेच आहे, हे ही सगळे जाणून आहेत. त्यामुळे, अगदीच दंडवत घातले नाहीत तरीही ’दुरून नमस्कार देवाला’ अशी सोयीस्कर भूमिका बहुतांश देश घेतील. चीनची बॉक्सिंग कितीही आवडत नसली तरीही!

........................................

Friday, 10 April 2020

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे



परवा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा एक व्हिडियो व्हायरल झाला होता. इटलीमधील लेखिकेच्या पत्राच्या अनुवादाचे त्यांनी वाचन केले होते. पण, या सिद्धहस्त अभिनेत्रीचा हा व्हिडियो बघितल्यावर एक प्रचंड भीतीची, निराशेची भावना निर्माण होते. या उलट, अमिताभ बच्चन यांच्यासह देशभरातील इतर अनेक कलाकारांना घेऊन दुसरा एक व्हिडियो तयार करण्यात आला होता. तो मात्र अत्यंत सकारात्मक होता आणि धीर देणाराही. बर्वे यांनी काय सादर करावे ही निवड अर्थात त्यांची आहेच. पण मुद्दा येथे सकारात्मकतेचा आहे. सध्या संकटकाळात आपल्या विचारांमधून, कृतीतून काय पेरायचंय, हा या मागचा विचार आहे.

आणि येथेच सामान्य माणसाच्या मदतीला भारतीय विचार, पद्धती आणि अगदी कर्मकांडेही मदतीला धावून येतात. घरी बसून काही न करता करोनाच्या बातम्या वाचणे आणि त्या संबंधित आकडेवारीचा रोज मागोवा घेत राहणे काहींसाठी रंजक असेलही पण बहुतेकांसाठी नाही. आणि त्यातून भीती आणि नकारात्मकता रुजतच नाही असे कुणी छातीठॊकपणे सांगू शकणार नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला व्यग्र ठेवणे, ते ही सकारात्मक गोष्टींमध्ये, हे अत्यंत आवश्यक आहे. या करिता भारतीय संस्कृतीने आपल्याला अनेक पर्याय सहज उपलब्ध करून दिले आहे. आपले धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक साहित्य अशी सकारात्मकता आपल्यात पेरत जाते. आता प्राचीन साहित्य म्हणजे चमत्कारांच्या कथा नव्हे. अर्थात त्यातूनही अनेकांना समाधान मिळते आणि ते मिळूही दिले पाहिजे. तॊ दैववाद आहे हे मान्य करुनही!

पण, भारतीय साहित्य या पलीकडे बरेच काही आहे. आधुनिकीकरणाकडे जाताना आपण जगभराचे साहित्य आत्मसात करत गेलॊ पण काहीसे आपल्याच आध्यात्मिक साहित्याकडे दुर्लक्ष झाले. रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा या सर्वज्ञात साहित्यापासून इतर अक्षरश: हजारो गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे. आवड, पिंड, कल, पातळी या प्रत्येक गॊष्टीनिहाय हे साहित्य उपलब्ध आहे. आणि त्याच्या वाचनातून आपल्यात काय पेरले जाते तर ती सकारात्मता! संकटकाळातही निभावून जाईल हा विश्वास. नकारात्मकतेचा स्पर्शही आपल्याला हॊऊ शकत नाही इतकी शक्ती या प्राचीन भारतीय पारंपारिक साहित्यात आहे. आणि हे मी शुद्ध वैचारिक ठेव्याबद्दल बोलतॊ आहे. चमत्काराच्या कथांबद्दल नाही.

ही सकारात्मकता आपल्या जीवनशैलीने आणि या विचारांच्या नकळत आपल्यावर झालेल्या संस्कारांनीही भारतीयांच्या आयुष्यात पेरली आहे. माझा एक मित्र म्हणतॊ,’ आपण भारतीय फार चिवट आहोत’. हे जे चिवटपण आहे ते या पोषणातून आले असावे असे वाटत राहते. भारतीय परंपरांना दैववादी म्हणून नाकारता येऊ शकते. पण, त्यातून भारतीयांमध्ये दीर्घकाळ वाट बघण्याची तयारी, संयम पेरला आहे हे ही नाकारता येत नाही. तो भक्तीमार्गातून, देवाच्या आराधनेतून रुजला असला तरी त्या मागचे तत्त्व हे शुद्ध आध्यात्मिक आहे. आणि कदाचित कुणाला पटणार नाही पण त्यातून सकारात्मकता आपोआप तुमच्यात रुजत जाते.

बुद्धीवादाचे समर्थक यास दैववादाचा अनाठायी अट्टाहास म्हणून नाकारू शकतात. पण खरे तर असे नाही. केवळ बुद्धीच प्रमाण मानली तर त्या निकषावरही भारतीय साहित्य तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करते.

'सदा सर्वदा देव सन्निध आहे

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे'

हे सांगणारा समर्थांचा श्लोक दैववाद सांगत नाही. तो  संकटकाळातही स्थिरबुद्धीने वाटचाल करीत राहण्याचे, संयमाचे आणि अर्थात सकारात्मकतेचे महत्व सांगत असतो. आपण, या विचारांकडे डोळसपणे बघत नाही हा आपला दोष, त्या साहित्याचा नव्हे. आणि हा तर केवळ एक श्लोक आहे. अशा अगणित गोष्टी सांगता येतील.

’बाहेर जाणे बंद असताना आत डोकावण्याची उत्तम संधी आहे’ या अर्थाचा एक मेसेज खूप प्रसृत झाला आहे. भारतीय आध्यात्मिक साहित्य हे अशा आत डोकावण्याचे साठीचे उत्तम साधन आहे.

........................................

Sunday, 5 April 2020

सिंफनी- ओळख पाश्चात्य संगीताची



भारतीय संगीत कोणत्या ना कोणत्या स्वरुपात आपल्यापर्यंत स्वाभाविकपणे पोहोचत असते. कधी ते शास्त्रीय संगीत म्हणून तर कधी लोकगीत म्हणून. पाश्चात्य संगीताची मात्र आपली फारशी सलगी नसते, माझ्यासारख्या अनेकांची तर तोंडओळखही नसते. आपल्या भोवतालच्या वातावरणातून ते स्वाभाविकपणे आपल्यापर्यंत येत नाही. आपल्यातील बहुतांश लोक पाश्चात्य संगीताच्या त्या वैभवाला मुकले असतात. आरडाओरडा आणि ठणठणाट म्हणजे केवळ पाश्चात्य संगीत नव्हे हे आपल्यापर्यंत पोहोचलेच नसते. ते ऐकून त्यातील सौंदर्य कसे अनुभवावे ही जाण माझ्यासारख्या अनेकांची विकसित झालेली नसते. पण, पाश्चात्य संगीत समजून घेऊन त्यातला आनंद घेणारेही दर्दी असतात आणि त्यांना त्यातले चांगले-वाईटही कळत असते. जागतिकीकरण आणि त्यातही स्मार्ट्फोनच्या काळात जगभरातील संगीत प्रचंड गतीने आणि मोठ्या प्रमाणात पोहोचले. पण, हे सगळे नव्हते तेव्हाही आपल्याकडे पाश्चात्य संगीताचा कान विकसित झालेले लोक कमी संख्येने- मुख्यत्वे मोठ्या शहरांतील- का असेना पण होतेच. पण माझ्यासह अनेकांना पाश्चात्य संगीत हे काहीसे अगम्यच असते. अशांना पाश्च्यात्य संगीताची तोंडऒळख सोप्या शब्दांत करून देण्याचे काम अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित ’सिंफनी’ हे पुस्तक करून देते.

पाश्च्यात्य संगीताची सुरुवात आणि विकास चर्चच्या सानिध्यात झाला. युरोपात गाजलेले अनेक संगीतकार, वादक आणि गायक हे चर्चच्या छत्राखाली आणि सान्निध्यात आपल्या संगीताची आराधना आणि काम करीत होते. किंबहुना, पाश्चात्य संगीताचा सुरुवातीचा मोठा कालखंड हा चर्चच्या आधाराने विकसित झाला आहे. सिंफनी हे पुस्तक या संपूर्ण कालखंडाविषयी विस्ताराने माहिती देते. मध्ययुगापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत असा पाश्चात्य संगीताचा वेध हे पुस्तक घेते. बाख, बीथोवन, मोझार्ट यांच्यापासून ते एल्विस प्रिस्ले, बीटल्स आणि मायकेल जॅक्सनपर्यंत अनेक दिग्गजांची कारकीर्द, त्यांचे काम, आयुष्यातील चढ-उतार आणि यशापयश असा सगळा पट पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जातो. पाश्चात्य संगीतातील अनेकविध संज्ञाही पुस्तकात दिल्या आहेत. थोडक्यात पाश्चात्य संगीताविषयी रस निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करते. अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांत भरगच्च माहिती असते, त्याचा  प्रत्यय येथे देखील येतो.

वर उल्लेख केलेल्या महान संगीतकारांची चरित्रेही विस्ताराने आणि चांगल्या पद्धतीने दिली आहेत. किंबहुना, तो या पुस्तकातील सर्वात रंजक भाग असावा. संगीतकारांची कारकीर्द आणि त्यांचे जीवन यांच्या वर्णनाच्या ओघात युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीचे ओझरते दर्शन आपल्याला घडत जाते.

विविध कालखंडात विभागणी करून पाश्चात्य संगीताची माहिती पुस्तकात देण्यात आलेली आहे. ती वाचताना आपण त्या जगाकडे निश्चितच खेचलॊ जातो. मात्र, सुरुवातीच्या काळातील संगीतावरील लेखन कदाचित पुरेशा ताकदीने संपादित झालेले नाही आणि काहीशा तुटकपणे मांडले गेले आहे असे वाटत राहते.

पाश्च्यात्य संगीताचा कालखंड हा मध्ययुगापासून या पुस्तकात गृहित धरण्यात आला आहे. इ.स. पूर्व ५०० च्या आधी ’ अंधार युग’ होते असेही मानले जाते. जवळजवळ नवव्या शतकापर्यंत युरोपियन चर्च संगीत आणि या वादन कला प्रकाराला ’सैतानाची कला’ म्हणून संबोधत होते. भारतीय़ संस्कृतीत संगीताचा माग काढला तर आपण अगदी वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. भारतीय संगीताला किमान चार हजार वर्षांचा इतिहास आहे यासारखे उल्लेखही सुखावणारे आहेत. राजे आणि श्रीमंताच्या आश्रयाने संगीताचा विकास झाल्याचे दाखले आपल्याकडे दिसतात. असाच प्रकार पाश्चात्य जगातही होता.

कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य बघावे की बघू नये हा नेहमीच वादाचा विषय असतो. गाजलेल्या पाश्चात्य संगीतकारांचे आयुष्य भारतीय मानकांनुसार कसे विस्कळित आणि अस्थिर होते हे ही पुस्तकातून जाणवत राहते. किंबहुना, ते वाचताना जागोजागी अलीकडेच येऊन गेलेल्या ’उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाची आठवण येत राहते.

सिंफनी हे पुस्तक पाश्चात्य संगीताकडे आकर्षित करणारे निश्चितपणे आहे. ज्यांनी ते अद्याप ऐकले नाही त्यांनी तशी सुरुवात करण्याची मनोभूमिका हे पुस्तक तयार करून देते. याच पुस्तकातील काही वाक्ये उद्धृत करून शेवट करतो.

’संगीत आपले आयुष्य सुंदर आणि समृद्ध करायला मदत करते. संगीत आपल्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मर्यादांच्या पलीकडे नेते. शरीर-मन-आत्मा यांना एकत्र आणते. आपल्या अंतर्मनाला बाह्य स्वरुपात व्यक्त होण्यास मदत करते. आनंद, राग आणि  दु:ख या तिन्हीमध्ये संगीत साथ देतं. आत्मिक समाधानाची अनुभूती म्हणजे संगीत!’

अशी अनुभूती ज्याला ज्या संगीतातून मिळेल त्याने ती तिथून घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते भारतीय असो, पाश्चात्य किंवा मग दोन्हीही!

Saturday, 13 July 2019

नमन नारायणा

दूरदर्शनच्या जमान्यातील काही मालिका आणि काही व्यक्तिरेखा आपल्या मनात कायमचे घर करून बसल्या आहेत. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ मधील ‘माझ्या तुमच्या जुळता तारा’ सारख्या! नाही तर मग कार्यक्रम किंवा मॅच सुरू होण्यापूर्वी दिसणाऱ्या इस्टमनकलर आडव्या पट्ट्यांसारख्या. लहानपणीच्या आठवणींच्या कप्प्यात रुजलेली अशीच एक मालिका होती, मालगुडी डेज. त्यातही त्यातला तो ‘स्वामी’वाला मुलगा. त्याचा चेहरा, भाव, डोळे यांपासून ते त्या मालिकेतील दाक्षिणात्य वातावरणापर्यंत सगळं सगळं डोक्यात फिट्टं आहे. शिवाय मालगुडी डेजची शीर्षक सुरावटही. नंतरच्या की-पॅडवाल्या नोकिया मोबाइल्सच्या जमान्यात आपल्यापैकी कित्येकांनी ती रिंगटोन म्हणूनही मिरवली. आजही मध्येच कुठेतरी ‘तानाना तानानाना ना ’ ऐकू येतं आणि टाइममशीन आपल्याला मालगुडीच्या काळात घेऊन जातं.
नंतर... बरंच नंतर, कधी तरी कळले की मालगुडी डेज कुणीतरी आर.के.नारायण या माणसाने लिहिलंय अन् इंग्रजी साहित्यात ते मोठं वगैरे नाव आहे. तोपर्यंत इंग्रजी पुस्तके वाचण्याचा काही प्रश्नच उद्भवला नव्हता आणि स्वाभाविकपणे सगळे पोषण मराठीच्या जीवावर चालले होते. तर, असाच कधीतरी आर.के.नारायण नाव ऐकलं आणि हा माणूस मोठा आहे, असेही कळले. पण, मालगुडीच्या आधी त्यांचे नाव पोहोचले होते, ते गाइड चित्रपटामुळे. दूरदर्शनवरच पहिल्यांदा बघितलेला हा चित्रपट त्यांच्याच कादंबरीवर आधारित होता, हे कळले. त्यानंतर मालगुडीचा संदर्भ लागला.
तेव्हापासून आर.के.नारायण हे भारतीय साहित्यातील मोठे नाव वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांकडून कानावर पडायला लागले. चांगले आणि नियमित इंग्रजी वाचणारे किंवा शिकवणारे लोक ‘नारायण’ वाचायला सांगायचे. त्यामुळेही आकर्षण निर्माण झाले होते. पण, तेव्हापासून आजतागायत आर.के.नारायण यांचं साहित्य मुळातून वगैरे वाचणे जमलेच नाही. म्हणजे गाइड किंवा मालगुडीचा थोडा अपवाद, कुठे तरी आलेले अनुवाद, मध्येच एखाद्या दिवाळी अंकात वाचलेला एखादा लेख, इंटरनेटवर केलेलं वाचन असाच काय तो संबंध आला. जुन्या पुस्तकांबद्दल आणि साहित्यिकांबद्दल हे असंच होतं. गिरीश कार्नाड वारले की आता त्यांचे सगळे लिखाण वाचूनच काढू असा न पूर्ण होणारा निर्धार केला जातो. जे कर्नाडांचे तेच नारायण यांच्या बाबतीतही. नवं काही तरी पुढे येतं, ते ताज्या संदर्भांवर आधारलेलं असतं आणि मग आधी तेच वाचले जाते. जुन्या चांगल्या साहित्याबाबतचा संकल्प पुन्हा तसाच राहतो. पण, असं सगळं असूनही ही मोठी माणसं मनात वसलेली असतातच. आणि म्हणूनच म्हैसूरला जायचं ठरलं तेव्हा आर.के.नारायण यांचे तेथील निवासस्थान बघायचेच हे ठरवून टाकले होते.
म्हैसूरचा स्थळदर्शनाच्या यादीत ‘नारायण-निवास’ वगैरे नव्हतेच. सामान्यत: म्हैसूर फिरायला जाणारे फार कुणी या ठिकाणाचा आग्रह धरत नसावेत. हा ‘नारायण’ म्हैसूर मुक्कामी राहायचा हे कदाचित माहीत नसावे अथवा अप्रूप नसावे. असलेच पाहिजे असाही काही नियम नाही. पण, माझे पक्के होते, की हे ‘आर.के.’ निवास बघायचेच. म्हैसूरची इतर सगळी ठिकाणे बघितल्यावर तिसऱ्या दिवशी ड्रायव्हरला सांगितले. आर.के.नारायण यांचे घर बघायचे आहे. ‘कोई म्युझियम है क्या?’ माझा कन्नड ड्रायव्हर नंदीश त्यांच्या कन्नड हिंदीत उद्गारला. ‘हाँ, म्युझियमच है’ मी माझ्या मराठी हिंदीत उत्तर दिले. मग, नंदीशने प्रयत्न सुरू केला ते घर कुठे आहे ते शोधण्याचा. पण, त्याच्या ओळखीच्या कुणालाच अशी काही ‘टूरिस्ट प्लेस’ आहे, याचा थांगपत्ता नव्हता. अखेर, गुगलबाबांच्या मदतीने माग काढत पोहोचलो आणि विवेकानंद रोडवरील त्या साहित्यमहर्षीच्या घरासमोर जाऊन उभे ठाकलो. दारावरच पाटी होती, ‘आर.के.नारायण हाऊस’. राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी असे नाव धारण करणाऱ्या सिद्धहस्त लेखकाचे घर.
भारतीय माणसाला गोष्टी आवडतात. आपलं जुनं सगळं साहित्य आपल्यापर्यंत गोष्टींच्याच तर रुपात पोहोचलेलं असतं. कशामुळे ठाऊक नाही, पण आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्टीवेल्हाळपणा ‘इन-बिल्ट’ आहे असं आपलं मला एक उगाच वाटत राहतं. ‘कसं आहे ना...’ ने सुरू करीत आपण हा गोष्टीवेल्हाळपणा रोजच खुलवीत असतो. आर.के. नारायण किंवा रस्किन बाँड यांचं साहित्य अशा ‘गोष्टी-स्वरुपा’मुळे आवडत असावं! अशाच आवडणाऱ्या, जगण्याच्या गोष्टी आयुष्यभर सांगत आलेला हा माणूस. पण, नारायण यांच्या घरात आपण प्रवेश करतो आणि त्यांची वेगवेगळी छायाचित्रे बघायला लागतो तेव्हा ही व्यक्ती बराचशी अबोल असावी, असं उगाचंच वाटत राहतं. एकदम गंभीर, दाक्षिणात्य विद्वतपुरुष वगैरे. काहीसा करारी. तरीही हजारो-लाखो वाचकांना भावेल अशी साहित्यनिर्मिती करणारा हा माणूस खुणावत राहतो.
म्हैसूरमधील जुन्या जमान्यातील भक्कम बांधकामाच्या दुमजली बंगल्याला उत्तम प्रकारे जपत त्याचे रुपांतर आता संग्रहालयात करण्यात आले आहे. सकाळी दहाच्या ठोक्याला उघडणाऱ्या या संग्रहालयात प्रवेश केला आणि भारतीय साहित्यात अजरामर ठरलेल्या या विद्वानाचे अनेक पैलू उलगडत गेले.
नारायण यांचा हा बंगला उत्तम प्रकारे जपला गेला आहे. मूळ घराचे स्वरुप तसेच राहील याची पुरेपूर काळजी घेत नवे काम करण्यात आले आहे. त्यांचे टेबल-खुर्ची, त्यांचे पोशाख, महत्वाच्या प्रसंगी, परिवाराबरोबर किंवा मोठ्या व्यक्तींबरेाबर काढलेली छायाचित्रे, भिंतीतील जुन्या पद्धतीच्या कपाटांमध्ये नीटसपणे रचून ठेवलेली ग्रंथसंपदा, त्यांच्या संग्रहातील इतर लेखकांची पुस्तके असा सगळा ऐवज आपल्याला त्यांच्या काळात घेऊन जातो. दुमजली बंगल्यात लहान-मोठ्या खोल्यांमधून नारायण यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल माहिती देणारे मोठाले फलक लावले आहेत. त्यांनी स्वत: केलेले लिखाण, त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेले लेख, पद्मविभूषणपासून ते इतर पुरस्कार, पुस्तकांची भली मोठी यादी या फलकांमधून मांडण्यात आले आहे. या घराचे संग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रयत्नांची माहिती देणारा एक स्वतंत्र फलक लावला आहे.
आणि, या शिवाय लक्ष वेधून घेतात ती भिंतींवर रंगविलेली नारायण यांचीच स्वत:ची वाक्ये. एकाहून एक. 'Do You realize how few ever really understand how fortunate they are in their circumstances?' अशी वेगवेगळी वाक्ये वाचून आपण चमकतो आणि एक क्षण विचारातही पडतो. नारायणाची शब्दशक्ती, अजून काय? बंगल्याचा खालचा मजला आणि चॉकलेटी रंगात रंगविलेला वळणदार जिना चढून गेल्यावर दिसणारा वरचा मजला... नारायण सर्वत्र व्यापला आहे.
खुशवंत सिंह यांच्यासारख्या समकालीन लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेले लेखही येथे वाचायला मिळतात. या सगळ्यात संदर्भातून जुजबी का होईना, भारतीय इंग्रजी साहित्यातील हा माणूस आपल्याला माहिती होत जातो. संयुक्त राष्ट्र संघात काम केलेले माजी सनदी अधिकारी सी.व्ही.नरसिंहन यांनी नारायण यांचा एक किस्सा सांगितला आहे. २००० साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नरसिंहन यांनी त्यांना अभिनंदनासाठी फोन केला तर त्यावर नारायण यांनी काय प्रतिक्रिया द्यावी, ‘आता मी पद्म विदूषक झालो’. दाक्षिणात्य नारळी तैलबुद्धी, आणखी काय? साहित्यातील नोबेल पारितोषिकासाठी देखील नारायणांचे नाव अनेकदा पुढे आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना हा पुरस्कार त्यांना मिळू शकला नाही. असे एक ना अनेक पैलू या संग्रहालयाने कायमचे जतन करून ठेवले आहेत.
प्रचंड ग्रंथसंपदा असलेला हा माणूस शेवटच्या क्षणापर्यंत लिहिता होता. द हिंदूचे संपादक एन.राम त्यांना मृत्यूच्या काही तास अगोदर भेटले होते. व्हेंटिलेंटरवर असलेल्या नारायण यांनी त्यांना डायरी मागितली, कारण त्यांना आणखीही बरेच लिहायचे होते, सुचत होते. स्वत: राम यांनी लिहिलेला किस्साही येथे आपल्याला वाचायला मिळतो. शेवटपर्यंत सर्जकता टिकवून ठेवलेला तरीही ‘नव्वदीत गेल्यापासून मी लिहिण्याच्या बाबतीत अंमळ आळशीच झालो आहे’, असे मिश्किलपणे सांगणारा हा सिद्धहस्त लेखक आपल्याला त्या दुमजली घरात भेटत राहतो. आपल्याला दुरूनच माहिती असलेले आर.के.नारायण येथे किंचित जवळ येतात.
या घराचे रुपांतर संग्रहालयात करण्यात म्हैसूर महापालिकेने पुढाकार घेतला आहे. नागपुरात ग्रेस, सुरेश भट यांच्यासारखी मोठी माणसे होऊन गेलीत. पण, नागपूर महापालिकेला त्यांचे स्मारक वगैरे उभे करावे, असे काही वाटले नाही, असा एक निरर्थक विचार माझ्यासारख्या नागपूरकराच्या मनात डोकावून गेला. पण, ते एक असो.
१९९० सुमारास नारायण यांनी हे घर सोडले आणि ते चेन्नईला राहायला गेले. १९४२ मध्ये लघुकथांचा संग्रह असलेले ‘मालगुडी डेज’ प्रसिद्ध झाले होते. जवळ जवळ सहा दशके हा माणूस लिहिता होता, हे लक्षात घेतले पाहिजे. अरे हो, या लिहित्या घराला अद्यापही दररोज शंभरच्या वर लोक भेटी देतात, हा एक सुखद धक्का तेथील ‘व्हिजिटर्स रजिस्टर’मुळे बसतो.
नशीब नावाची गोष्ट मोठी मजेदार असते. आर. के. नारायण नावाचा प्रचंड प्रतिभाशाली माणूस एका घरात जन्माला घातला. पण, त्या कुटुंबाचे सद्भाग्याचे पारडे बरेच मोठे असावे. त्याच घरात अजून एक प्रतिभावंत दिला पाठवून. नाव मिळाले, आर.के.लक्ष्मण! तेच, कॉमन मॅनवाले प्रसिद्ध व्यंगचित्रकार. नारायण यांच्या लेखनाला पूरक रेखाचित्रे लक्ष्मण यांनीच काढली होती. दोन भावंडांनी मिळून भारताला भरभरून आनंद दिला. दोन्ही भावांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. नारायण-लक्ष्मणाची जोडी रामायणानंतर भारतात पुन्हा अवतरली होती. आपल्यासारखे आपणच भाग्यवान.
‘मालगुडी डेज’ या मालिकेचे काही भाग कर्नाटकातील अगुंबे या गावात आणि तेथील एका वाड्यात चित्रित झाले होते. त्या आगुंबेला भेट देण्याची, अगदी त्याच वाड्यात राहण्याची संधी २०१३ मध्ये मिळाली होती. त्या ‘मालगुडी’च्या जनकाचे स्मरण जागविणारी वास्तू सहा वर्षांनी बघायला मिळायली. एक वर्तुळ पूर्ण झाले. आता, आर.के.नारायण वाचले पाहिजेत, मुळातून.....!

Wednesday, 5 June 2019

कुशीत कूर्गच्या आणि कावेरीच्या




अॅनाकोंडा, गॉडझिला किंवा त्या छापाचे चित्रपट आठवतात का? पडद्यावर काहीसा गूढ अंधार, अजगरासारखं शांत पडलेलं खोल पाणी, आजूबाजूला घनदाट झाडी अन् जंगल. घरात करमत नसल्यामुळे अॅडव्हेंचरला जाऊन फुकट जीवाला घोर लावून घेणारे गोरे आणि गोऱ्यांची पोरे. सगळं व्यवस्थित चाललं असताना मध्येच तो अॅनाकोंडा अवतरतो. पडद्यावर आणि थेटरात सगळ्यांचे जीव वर-खाली करायला सुरुवात करतो. नोटाबंदीनंतर आपले पंतप्रधान ज्या-ज्या वेळी टीव्हीवर येऊन ‘मित्रों’ म्हणाले तेव्हा अनेकांचा जीव असाच वर-खाली व्हायचा. ते एक असो. मुद्दा अॅनाकोंडाचा आहे. तर तो महाप्रचंड साप, त्याच्या अवतीभवतीचं गूढ वातावरण आणि टॉप शॉटसमधून दिसणारं, दूरवर पसरलेलं गर्द हिरवं जंगल. नव्वदीत आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला  डब केलेल्या फिरंगी चित्रपटांनी भारतात धुमाकूळ घातला होता. महाअजस्र प्राणी आणि ‘जॉन, वहाँ पर कुछ है’ असे डिस्कव्हरी छापाचे डबिंग असलेले हे पिक्चर फुल्ल माहोल पिटत होते. त्या चित्रपटांनी दाखविलेले जंगलांचं गूढ रूप तुम्हाला आठवत राहतं, ते गर्द काळपट हिरवेपण तुमच्या अवतीभवती पसरलेले असतं, तुम्ही कूर्गमध्ये असता! कर्नाटकातल्या कूर्गमध्ये.
उत्तर केरळला लागून असलेलं, कर्नाटकातील इतर शहरांपेक्षा पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेने जवळ असलेले कूर्ग.  राहुल गांधी यांनी अमेठीतून रणछोडदास होत जेथून लोकसभा निवडणूक लढवली, ते केरळातील वायनाड हे कूर्गपासून तीन तासांच्या अंतरावर. सरकारी जिल्हा कोडागू. उटी, म्हैसूर यांच्या तुलनेत कूर्ग तितकंसं पर्यटकांमध्ये अद्याप लोकप्रिय नाही. म्हणजे मागील दशकभराच्या कालावधीत कूर्गचं नाव लोकांपर्यंत पोहोचू लागलंय. आम्ही कूर्गला जाणार म्हटल्यावर नेमकं कुठाय ते, काय आहे तिथे बघण्यासारखं वगैरे प्रश्न आपसूकच येत होते.  मुळात कूर्ग नावाचं ठिकाण असं काही अस्तित्वात नाही. मडिकेरी हे या जिल्ह्यातलं मुख्य गाव. प्रशासकीयदृष्ट्या महत्वाचं. पण, लोकांचं कूर्गकडे लक्ष जाण्याचं कारण येथे जिकडेतिकडे पसरलेलं जंगल आणि आल्हाददायक वातावरण. कूर्गमध्ये जंगल आहे म्हणण्यापेक्षा हा अख्खा जिल्हाच जंगलात वसवला आहे, असे म्हटले तर तो ‘जुमला’ठरू नये. खरं तर मला अतिशयोक्ती शब्द वापरायचा होता, पण ते एक असो.
बंगलोरहून निघाल्यावर म्हैसूरला मागे टाकत आपण मडिकेरीला पोहोचू शकतो. मुळात म्हैसूर हेच एक सुंदर शहर आहे. पण, कूर्गची हवा वेगळी. समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंचीवर रेनफॉरेस्टने व्यापलेलं हे ठिकाण. वळणदार रस्ते, ज्या रस्त्याने जाल तिकडे आजूबाजूला उंचच उंच वाढलेली झाडं, साथीला नारळ आणि कॉफी. ज्यांनी हिमालय बघितला आहे त्यांना येथील वळणदार रस्त्यांचे आणि थंडीचे फार काही वाटणार नाही. पण,  ही तुलना केली नाही तर आनंदात आणखी थोडी भर पडेल हे निश्चित.
सुरुवातीला उल्लेख केला तशी अॅनाकोंडाची आठवण करून देणारी ठिकाणी कितीतरी सापडतील. निसर्गधामसारखं वन विभागाने विकसित केलेलं ठिकाणं असो की हत्तींसाठी विशेषत: बनविलेला दुबारे एलिफंट कॅम्प! कूर्गला कावेरी नदीचं वरदान लाभलंय. मुळात कावेरी नदीचा उगमही याच जिल्ह्यातला. तालकावेरी येथील डोंगरातून ही नदी उगम पावते. तिथे आता मंदिर उभं राहिलंय आणि आजूबाजूला दूरवर पसरलेली घनदाट अभयारण्य हा प्रदेशच संरक्षित जंगल म्हणून जाहीर करण्यात आला आहे. येथून निघालेली कावेरी जिल्हाभर बागडत राहते. निसर्गधाम हे छोटंस बेट तिनंच निमाण केलेलं. अॅनाकोंडावालं फिलिंग देणारं. दुबारे एलिफंट कॅम्प म्हणजे लहान मुलांसाठी आणि लहानांसारखं मन असणाऱ्यांसाठी मज्जेचं ठिकाण. २०-२५ लहानमोठे हत्ती, कावेरी नदीत त्यांच डुंबणं, त्यांच्या सेवेत असलेले आणि या महाकाय प्राण्याला मुठीत ठेवू बघणारे माहूत यांचं हे विश्व. या कॅम्पवर जाण्यासाठी कावेरी नदी ओलांडून जावं लागतं.  नदी फुल फॉर्मात असते तेव्हा बोटींनी कॅम्पपर्यंत जावं लागतं. आम्ही गेलो तेव्हा पाणी बरेच कमी होते आणि नदीतील दगड वर आलेले. तरीही वेगवान, खळाळत्या कावेरीतून, पाण्यातून आणि दगडांवरून तोल सावरत जाणं म्हणजे सही मजा. काळपट, हिरव्या रंगाच्या कावेरीतून पावलं टाकत आपण हत्तींच्या राज्यात पोहोचतो. हत्तींना चारा खाऊ घालणं, त्यांच्या अंगावर पाणी घालणं, त्यांनी सोंडेतून उडविलेला फवारा आणि त्याचा आपल्या अंगावर होणारा अभिषेक! रोजच्या जगण्यात आपण लहान-सहान आनंदांना पारखे झालो असतो. काहीतरी वेगळं घडावं म्हणून आस धरून बसतो आणि डिजिटल थ्रिल किंवा आनंद शोधत बसतो. हत्तींच्या सान्निध्यात केलेली मस्ती तुमच्यातील लहानपणाला पुन्हा जागं करते. खळखळणारी कावेरी तुमच्यातील अवखळपण पुन्हा एकदा जागवते. कावेरीच्या काठाने पसरलेली मोठाली झाडं आणि वेली नदीच्या पाण्यावर सावली धरून उभी असतात.  त्या सावलीचा थंडगारपणा आपल्याही मनावर पडत जातो.  कावेरीच्या भवताल पसरलेला शांतपणा आपल्यात भिनत जातो. निसर्ग आपल्या जवळ येऊन उभा ठाकतो. कूर्गच आणि कूर्गच्या कावेरीचं दर्शन सार्थक होतं. समाधान आणि आनंद सोपा-सोपा होऊन मिळत राहतो. आपण थबकलो असतो, पण कावेरी नाही आणि तिचा प्रवासही नाही.
..........................

Monday, 4 March 2019

घरं बोलत राहतात...



ऐसपैस पसरलेला वातावरणातील निवांतपणा, काहीसा गूढ पण तरीही हवाहवासा वाटणारा सावली-प्रकाशाचा खेळ आणि जोडीला खिडक्या-छपरांवरून उतरू पाहणाऱ्या वेली! प्रकाशाचा एक तिरपा कटाक्ष झेपावतो आणि त्याच कौला-वेलींवरून ओघळत जातो शब्दांचा मेळ! प्रकाशाचा वाटेने शब्द उलगडत जातात. आपला भवताल गच्च धरून उभ्या असलेल्या घराचे अवकाश कवेत येत जातं. किमया घडत जाते अन् घरं उमगत जातं!
माधव आचवलांनी १९६१ मध्ये लिहिलेलं ‘किमया’ हे घरांबद्दल बोलणारं पुस्तक रंगकर्मी अतुल पेठे उलगडून दाखवत होते, तेव्हा आसपास असंच काहीसं होत होतं. घर नावाचं अफाट प्रकरण आपल्या आयुष्यात तळ ठोकून बसलं असतं. उसवलेल्या दिवसाला संध्याकाळचं अस्तर  लावण्याच्या धडपडीत या घराकडे बघणं राहूनच जातं. लाखा-लाखांची आपली घरं आपल्यासाठी ‘प्रवाशांसाठी निवारा’ झाल्यासारखी झाली आहे. बाहेरच्या जगाने घरातलं जगणं बॅकफूटवर ढकललंय. पाय पसरून, डोळे मिटून अन् श्वास भरून घर स्वत:त सामावून घेण्याचे क्षणही तर मोजकेच झालेय.

कुणा त्या भन्नाट माणसाच्या डोक्यात आले असेल ना, ‘चलो, अभी सेटल होना है’! आणि माणसाने भटकंती सोडून घरं बांधायला सुरूवात केली. घरं काय अन् वास्तू काय! रंग, गंध, स्पर्श, सूर, नाद, इतिहास, भाषा, कला असे जगण्याचे हजारो कंगोरे आपल्यात सामावून घेऊन उभ्या असतात. अन् एवढ्याने काय होतंय? माणसाच्या जाणतेपणाचे आणि मूढत्वाच्या  प्रवासाचे पुरावे घेऊन वास्तू उभ्या आहेत जागोजागी! आपण, त्यांच्या समोर जाऊन उभं राहावं तर बोलायला लागतात!

म्हणे, माणसांचा इतिहास हा स्थलांतरांचा इतिहास आहे. आणि असं असेल तर घर काय असतं, हे स्थलांतरितांइतकं चांगलं कोण सांगू शकेल! येथे पुन्हा आपण कधीही राहणार नाही, हे लक्षात आलं असतं. उंबरा ओलांडून आणि पाठ फिरवून जाण्याच्या अगोदर घराच्या भिंती-दारांवरून हात फिरवून बघतात. काय साठवून घ्यायचं असतं त्या स्पर्शात! जणू काही आयुष्यभर तो स्पर्श टिकणार आहे, अशा असोशीने चाललं असतं. पण, त्याचं महत्व स्थलांतरितांना ठाऊक असतं, नाही तर मग मायबापाचं घर सोडून सासरी जाणाऱ्या लेकीला!

घरं बोलत राहतात, वास्तू सांगत राहतात. चित्र बोलतात ना तसंच! आपल्या आपल्या मनस्थितीनुसार पट विणत राहतात. हो, मनस्थितीनुसार पालटतं ना घरांचं जाणवणं! म्हणजे जी.ए.कुलकर्णी वाचून बाहेर पडलं तर एखादं घर केशवपन केलेल्या लाल वस्त्रातल्या विधवेसारखं जाणवायला लागतं. पु,लं. वाचून फिरायला निघावं तर तेच घर सुस्नात होऊन कोवळ्या उन्हात केस वाळवत बसलं असतं, नवथर तरुणीसारखं! घरं जाणवतात, निश्चितच!

घराशी बांधून राहणं हे भौतिकतेत गुंतत राहणं की त्याच घरात देवासमोर बसून त्यांच्याशी खुल्ला संवाद साधणं हे मोह-मायेच्या पलीकडलं. पहिलं जमलं तर राजस भाव रुजतो, दुसरं साधलं तर सात्विकतेचा सुगंध पसरतो. घरं, सगळंच साधतात. घरं मंदिरं होऊन जातात. कोणार्क आणि खजुराहोसारखी. प्रतिकं होऊन जातात समृद्धी, तादात्म्य, सौंदर्य, ऋजुता आणि एकरूपतेची! अध्यात्म तरी काय वेगळं असतं ना!

मंदार मोरोणे, नागपूर





*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...