Saturday, 31 March 2018

‘स्वच्छ’ हवा शैक्षणिक भारत!


फार दिवस नाही झालेत जागतिक महिला दिन पार पडून! अवघ्या वीस दिवसांपूर्वी झालेल्या या जागतिक उत्सवानिमित्त युनेस्कोने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. मुला-मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणाचा आढावा या अहवालातून घेण्यात आला होता. या अहवालानुसार वर्षागणिक मुलींचे शाळांमध्ये जाण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असले तरी जगभरात अद्यापही ते मुलांच्या बरोबरीत आलेले नाही. मुलींच्या शाळेत न जाण्याची विविध कारणे आहेत आणि त्यांचा ठिकठिकाणी उहापोहही झाला आहे. मात्र, या अहवालानुसार इतर कारणांप्रमाणेच शाळा- कॉलजेस मध्ये स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसल्याने अनेक मुली शाळेत नियमित जात नसल्याचे दिसून आले आहे. विशेषत: मुलींच्या पाळीच्या दिवसात स्वच्छतागृहात व्यवस्था नसल्याने महिन्यातून किमान तीन दिवस मुली शाळांमध्ये हजेरीच लावत नाही, अशी माहिती या अहवालातून मांडली गेली आहे. जगातील दर दहापैकी एक विद्यार्थिनी तिच्या पाळीच्या दिवसांमध्ये शाळेत जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जगभरातील विविध देशांचे सर्वेक्षण करून हा अहवाल महिला दिनाला जाहीर करण्यात आला होता.
भारतातही शालेय संस्थांमध्ये मुलींसाठी उपलब्ध असलेली स्वच्छतागृहे, तेथील सुविधा आणि त्यांची स्थिती हा चिंतेचाच विषय आहे. विशेषत: ग्रामीण भागात तर त्यांची परिस्थिती अधिकच बिकट आहे. त्यामुळे युनेस्कोने जगभरातील सरकारकडे मुलींच्या स्वच्छतागृहांच्या प्रश्नांना प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे. शाळांमध्ये फक्त मुलींसाठीची स्वच्छतागृहे पुरविण्यात यावी असे आवाहनही याच अहवालाद्वारे करण्यात आले आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसलेले सर्वाधिक लोक भारतात राहत असल्याचे सांगितले जाते. वॉटरएड या जागतिक स्तरावर स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने जगातील स्वच्छतागृहांची अवस्था मांडणारा अहवाल २०१७ मध्ये मांडला. त्या अहवालातूनही भारतातील आणि जगातील स्वच्छतागृहांच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
विविध अभ्यासातून आणि अहवालातून मांडली जाणारी परिस्थिती आपल्या आजूबाजूलाही असल्याचे जरा डोळसपणे बघितल्यास लक्षात येते. अर्थात, शहरी आणि ग्रामीण भागातील परिस्थिती नि:संशयपणे वेगळी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतागृहांची परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी अद्यापही सुधारणांना वाव आहेच. शहरातील शाळा आणि कॉलेजेसनी मात्र स्वच्छतागृहांकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे हे निश्चित. एके काळी शाळेमधील सर्वाधिक दुर्लक्षित करण्याजोगी व्यवस्था ही स्वच्छतागृहांची राहत असे. त्यांचे बांधकाम आणि स्वच्छता हा कसा तरी पार पाडण्याचा विषय होता. मात्र, शहरी भागातील चांगल्या शाळांमध्ये आता स्वच्छतागृहांची परिस्थिती तशी राहिलेली नाही. शाळांची आणि पालकांची जागरूकता या विषयात सुधारणा घडवून आणण्यास कारणीभूत ठरली आहे. 
मुलींच्या स्वच्छतागृहांच्या संदर्भात सर्वाधिक कळीचा मुद्दा येतो तो पाळीच्या दिवसांमधील व्यवस्थेचा. पाळीच्या काळात मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध असावेत यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. कॉलेजेसमध्ये व्हेडिंग मशिन्स बसविल्या गेल्या असून नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जात आहेत. केमिस्टच्या दुकानातून वर्तमानपत्रात गुंडाळून लपत छपत नेण्याचा हा विषय आता उघडपणे बोलला जाऊ लागला आहे. ‘पॅडमॅन’ सारखा चित्रपट तयार होतो हे समाज बदलत असल्याचे निदर्शक आहे. किंबहुना, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून देखील आता वरच्या वर्गातील विद्यार्थिनींना ‘पॅडमॅन’ दाखविला जाऊ लागला आहे, हे समाजात येत चाललेल्या मोकळेपणाचेच द्योतक आहेत. 

नॅपकिन्सच्या निचऱ्याची हवी व्यवस्था 

शहरी भागातील स्वच्छतेच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स मिळायला लागले आहेत. थोडक्यात सांगायचे तर  माहोल बदल रहा है. पण, सगळेच काही चांगले होतेय असे समजण्याचे कारण नाही. अनेकदा हे नॅपकिन्स स्वच्छतागृहांमध्येच टाकून दिलेले असतात. ते नष्ट करण्याची व्यवस्था पुरविण्यात आली नसते. पॅडसचा निचरा करणारी यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे स्वच्छतागृहांमधून उपलब्ध करून दिली जाणे आवश्यक आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा आणि निचर या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिले जावे. स्वच्छतागृहे स्वच्छ असली पाहिजे याची संबंधित शैक्षणिक संस्थेने काळजी घेतली पाहिजे अशा अपेक्षा पालक आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे कॉलेजेसमधील स्वचछतागृहे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीही आहे हे मुलींनाही समजणे आवश्यक असल्याचे मत कॉलेज विद्यार्थिनी व्यक्त करताना दिसतात.
विविध संस्थांच्या तसेच भारत सरकारच्या आकडेवारीनुसार स्वच्छता या विषयात भारताने बरीच प्रगती केली आहे. भारत सरकारच्या आकडेवारीतूनही स्वच्छतागृहांची देशातील संख्या वाढली आहे. मात्र, निर्माण होत असलेली ही व्यवस्था कायम टिकून राहणे गरजेचे आहे. शालेय वयातील मुलींच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी थेट संबंध हा विषय अधिक गांभीर्याने घेणे आणि आपल्या उमलत्या कळ्यांसाठी चांगली व्यवस्था निर्माण करून देणे ही समाज आणि शासन म्हणून आपली जबाबदारी आहे.
........................................................

Wednesday, 14 March 2018

दिल मे फकीर जिंदा रख!



मनातल्या विचारांना
अंत नसतो...
तसा तो सतत जन्म घेणाऱ्या
आकांक्षांनाही नसतो...
एक झाली की दुसरी,
फुटत जातात आकांक्षा...
कधी त्याला नाव समृद्धीचे,
कधी प्रगतीचे, तर कधी
कुठल्या तरी उदात्ततेचे..!

वडाच्या पारंब्या जशा
एकातून दुसरी जन्म घेतात ..
तसा एकीतून उगम दुसरीचा...
आणि आपण बसतो
वाढत्या झाडाला खतपाणी घालत...
एकदा मोठं झालं की मोकळं होऊ
अशी अपेक्षा करीत...

पण,
मोकळं काहीच होत नाही.

पुन्हा नवे धुमारे …
बरे-वाईट,
पुन्हा नव्या आकांक्षा …
आणि
पुन्हा त्यांना कुरवाळणं…
सतत तेच ते…
संपता संपत नाही…
कशाला अंत नाही…!

आणि अंत तर
संकटांनाही नाही…
पहिल्याला धीर करून
निपटून काढावं,
तर दुसरं हजर…
कंबरेवर हात धरून
आणि विटेवर पाय ठेवून…
सतत काय तर
लढत राहायचं…
प्रश्नांना नेहमी
भिडत राहायचं…

शांती हवी आहे प्रत्येकाला आयुष्यात.…
डोक्यातील सगळे विचार
आणि
प्रत्येकाने आपल्या मनात दाबून धरलेला
किच्च काळा कार्बनवाला कचरा,
प्रत्येकाला डिस्पोझ करावयाचा आहे.…

पण होत नाहीच तसं…

"पीस" शोधायला निघालेल्या
प्रत्येकाचीच निघतात पिसं…!
एकदा नाही, रोजच निघतात…
गळून पडणाऱ्या पिसांचा
रंग तेवढा वेगळा…
बाकी सगळे मोर उघडे-बोडखेच…

यातून वर येणारी स्थितप्रज्ञता…
तशी आपल्याकडे नसतेच…
‘आता मला त्रास होत नाही’
अशी वाक्ये हतबलतेतून येतात…
न थकता.न हारता
लढण्याची ताकद येते,
पण तीही अपरिहार्यतेतून…
ते काही ठरवून झाले नसते. जाणीवेतून आलेली स्थितप्रज्ञता
आपल्याला काही जमत नाही…
इतकी मौल्यवान शांतता
आपल्याला काही मिळत नाही…

त्यामुळे त्या अर्थाने आपण
फकीरच…
फकीर बाय फोर्स,
नॉट बाय चॉइस…
सगळा शेवट फकिरीतच म्हणजे..
मग हात आणि झोळी, फिरवायलाच हवी…
पडेल ते दान घेण्यासाठी…
आणि मिळालेलं दान
स्वीकारण्यासाठी…

तो फकीर जिंदा रख भाई...
दिल मे फकीर जिंदा रख! 

Thursday, 8 March 2018

कशासाठी.. पोशाखातील सहजतेसाठी!
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणे असो की शारीरिक कवायती, योगासने करणे असो. साडी अशा वेळेस अडचणीची ठरते. त्यामुळे, पंजाबी ड्रेस घालून शाळेत येण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अॅ‌क्टिव्ह टीचर्स फोरमचा भाग असलेल्या राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षिकांनी केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षिकांनी राज्य सरकारकडे या मागणीसाठी अर्ज, निवेदने दिली आहेत. या विषयाचा आणि शिक्षिकांमधील मत-मतांतराचा घेतलेला हा वेध.
...............
महिलांनी काय घालावे आणि काय घालू नये हा ‌आपल्याकडे काश्मीरइतकाच पेटू शकणारा ताकदीचा विषय आहे. नुसता ब्र जरी उच्चारला तरी टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. म्हणजे पारंपरिक पोशाखाचे समर्थक त्याचा संबंध थेट संस्कृती आणि महिलांच्या मानमर्यादांशी जोडतात. दुसरीकडे, त्याला तथाकथित व्यक्त‌िस्वातंत्र्याशी आततायीपणे जोडले जाते आणि अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य हे अराजकतेकडे नेणारे असते, हे भानही टांगून ठेवले जाते. पण, आता मध्येच हा स्फोटक विषय कशासाठी, असा प्रश्न पडला असेल तर त्यालाही उत्तर आहेत. नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षिकांनी शाळांमध्ये साडी नेसण्याचे बंधन घातले जाऊ नये यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. केवळ एकदा मागणी करून या शिक्षिका थांबलेल्या नाहीत. सातत्याने आठ महिन्यांपासून त्या पाठपुरावा करीत आहेत. अर्थात, शासनाच्या हत्तीला या विषयावर कड पालटण्यास वेळ मिळालेला नाही. पण ‌शिक्षिकांचा लढा सुरू आहे. आणि त्यांनी मांडलेले मुद्दे विचार करायला लावणारे निश्चितच आहेत.
साडी हा पारंपारिक भारतीय पोशाख आहे आणि तो चांगलाच आहे, हे या शिक्षिकांना मान्य आहे. मात्र, शाळेत तो पोशाख घालून दैनंदिन काम करणे अडचणीचे ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या शिक्षिका ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत. शाळांमध्ये, विद्यार्थ्यांबरोबर मैदानात खो-खो, कबड्डी असे खेळ, सामुदायिक कवायती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योगा साडीमध्ये कसा करायचा, असा प्रश्न त्या विचारीत आहेत. राज्य सरकारने प्रत्येक शाळेत योग दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याखेरीज, सूर्यनमस्कार, प्राणायाम, सामुदायिक कवायत, धावणे, लांब उडी, उंच उडी, इतकेच काय तर खो-खो, कबड्डी असे मैदानी खेळ खेळताना अथवा विद्यार्थ्याना शिकवताना होणाऱ्या वेगवान हालचालीमध्ये अनेक शिक्षिकांना साडीपेक्षा ड्रेस सोयीचा वाटतो. त्यामुळेच, साडीचा अनाठायी आग्रह सोडून ड्रेस घालण्याबाबत शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक काढावे अशी मागणी या शिक्षिकांनी केली आहे.
शिक्ष‌िकांनी कोणता पोशाख घालावा, याबाबत जिल्हा परिषदेचे काही नियम नाहीत. त्यामुळे साडीची सक्ती सरकारी अथवा खासगी शाळांमधील शिक्षिकांना करता येत नाही. साडीबरोबरच त्या ड्रेसदेखील वापरू शकतात. मात्र, असा आग्रह धरला जाण्यामागे सामाजिक स्पॉन्सरशिपचा मुद्दा आहे आण‌ि तो ग्रामीण भागात अधिकच तीव्र आहे. बहुतांश वेळा पुरूषी मानसिकतेतून घेतलेले निर्णय कसे असतात, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. दुसरे म्हणजे साडीच्या आग्रहाला आपल्या समाजाची गेल्या अनेक वर्षांमध्ये तयार झालेली मानसिकता चिकटलेली आहे. म्हणजे आधी नऊवार आणि नंतरच्या काळात सहावार साडी नेसली की स्त्रीला सभ्यतेचे प्रमाणपत्र देणारी आपली पारंपारिक मानमर्यादा आहे. साडी घातली की ‘डिग्न‌िटी’ येते, असा एक मतप्रवाह आपल्या येथे विद्यमान आहे. दररोज शाळांमध्ये इमानेइतबारे अध्यापनाचे काम करणाऱ्या अनेक शिक्षिकांचेही असे मत आहेच. म्हणजे, साडी घातली की लोकांचा किंवा विद्यार्थ्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे मानणाऱ्याही अनेक शिक्षिक आहेत. अर्थात, यामागे वर्षानुवर्षे विशिष्ट प्रकारे ‘कंडिशनिंग’ झालेला आपला मेंदू आणि मन आहे. त्याला पूरक असे पुरावे काही नाहीत. म्हणजे, साडीबाबत आपल्या समाजाचे असे हे एक मिथक आहे. कोणताही समाज विविध मिथकांवर चालत असतो आणि ही मिथके म्हणजेच काय ते सत्य, असे समाजातील बहुतेकांना वाटत असते. साडीभोवतीही असे एक ‘डिग्निटी’ नामक मिथक गुंडाळले गेले आहे.
आणि तरीही, अनेक श‌िक्षिकांना शिकविताना साडीच योग्य वाटते. त्यामुळे, त्यांच्या मताचाही आदर केला जायलाच हवा. आपल्या वेशभूषेवर विद्यार्थ्यांकडून मिळणारा आदर अवलंबून असतो. पंजाबी ड्रेसमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर नको इतके कमी होते. शिक्षकी पेशात असे अंतर असणे आवश्यक असते. हे अंतर राखण्यासाठी शिक्षिकांचा वेश खूप मोठी भूम‌िका पार पाडतो. शि‌‌‌क्षिकेच्या व्यवसायाला साडीच योग्य वाटते, मुलांना घडवायचे असते म्हणून तसे राहणे योग्य वाटते, अशा स्वरुपाचीही काही प्रातिनिधिक मते व्यक्त होताना दिसतात. साडीला सभ्यतेचा आणि ‌शिक्षण व्यवसायाला ‘उत्तम, उदात्त आणि उन्नत’चा टॅग चिकटलेला आहे. त्यामुळे, साडी अधिक योग्य वाटते, अशी विविध स्वरुपाची मते शिक्षिकांकडून व्यक्त होताना दिसतात. मुख्य म्हणजे असे वाटणाऱ्या शिक्षिकांचे प्रमाण जास्त आहे.
पण, म्हणून याचा विरोधी विचार अस्तित्वात नाही असे नाही. पंजाबी ड्रेस हा ‌अधिक ‘कम्फर्टेबल’ आहे, हा मतप्रवाहही मोठा आहे. विशेषतः वरच्या वर्गांना किंवा कॉलेजेसमध्ये शिकविणाऱ्या शिक्षिकांमधून हे अधिक जोरकसपणे मांडले जाते. मुलांच्या शरीरात बदल होत जातात तसे त्यांच्या नजरेतील भावही बदलत असतात. ही बदलणारी नजर लक्षात येते. शिक्षिका ‌शिकवत असताना, असे विद्यार्थी कुठे बघत असतात, हे शिक्षिकांच्या लक्षात येत असते. साडी या अवघडलेपणात भर घालते, असे स्पष्ट सांगणाऱ्या शिक्षिकाही आहेत. त्यामुळे, प्राथमिक शाळेपर्यंत साडी ठीक आहे मात्र त्या नंतर ‘हाय नेक’ ड्रेस असायला हवा. गणवेश म्हणून साडी ठीक आहे, पण पंजाबी ड्रेसमध्ये अधिक सुटसुटीत आणि सहज वाटते, ही भावनाही शिक्षिका बोलून दाखवितात.
तर, महिलांच्या पोशाखाला असे अनेक पदर आहेत आणि नगर जिल्ह्यातील शिक्ष‌िकांच्या मागणीने ते पुन्हा एकदा पुढे आणले आहेत. सुदैवाने, या मुद्द्याला त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा महिलांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचे ठिगळ जोडलेले नाही. त्यामुळे, सातत्याने आंदोलनाच्या मूडमध्ये असणाऱ्या चळवळ्यांना फारसे काही हाती लागणार नाही. पण, या शिक्ष‌िकांचा मुद्दा दुर्लक्षित करता येणारा नाही. त्यांनी कोणताही भावनिक मुद्दा न उचलता दैनंदिन कामातील सहजतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. कदाचित, आज त्या संख्येने फार मोठ्या नसतीलही पण वेगळी वाट चोखाळणारे नेहमीच कमी संख्येत असतात. बदलाची सुरुवात नेहमी लहानच असते हे एक सत्य आहे आणि बदल थांबविता येत नाहीत, हे इतिहासाने सिद्ध केलेले दुसरे सत्य आहे. आपण सगळे जाणतोच!
.........
शाळेत ड्रेस वापरता यावा यासाठी शासनाने सुस्पष्ट असे परिपत्रक काढावे, असा आग्रह शिक्षिकांनी धरला आहे. शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढायला हवे व अनुमती द्यावी, अशी श‌िक्षिकांची मागणी आहे. अन्यथा महिलांना बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. पुणे, नगर, बारामती, अकोले, उस्मानाबाद, नाशिक, कोपरगाव, संगमनेर, हवेली, पाथर्डी अश्या अनेक जिल्ह्यातील महिलांनी हे निवेदन शिक्षण संचालक आणि उपसंचालक यांच्याकडे सादर केले आहे. शिक्षण विभागकडून प्रतिसाद येईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने काही शिक्षिकांनी बंडखोरी करत ड्रेस वापरायला सुरुवातही केली आहे. शाळेत पोशाख घालून येताना आजवर शिक्षक अथवा शिक्षिकांनी रूढ सामाजिक संकेतांचे कधीच उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या वैयक्तिक समंजसपणावर विश्वास ठेवून पोशाख निवडीचे स्वातंत्र्य देऊन तातडीने उचित कार्यवाही करण्यात यावी असेही सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिक्षिकांना साडीऐवजी ड्रेस वापरणे सोयीचे वाटते. साडीबरोबरच अनेक तरुण शिक्षिका शाळेत ड्रेस वापरू लागल्या आहेत. पर्यवेक्षकीय यंत्रणेतील पुरुषसत्ताक मनोवृत्तीचे अधिकारी मात्र ड्रेसला हरकत घेत असल्याच्या तक्रारी आहेत. गरज आणि सोय लक्षात घेता पर्यवेक्षकीय यंत्रणा आणि समाजातील संबंधित घटकांनी शिक्षिकांच्या ड्रेसला आक्षेप घेणे किंवा मॉरल पोलिसिंग करणे योग्य नाही.
--भाऊसाहेब चासकर,
संयोजक, अॅक्टिव्ह टिचर्स फोरम, महाराष्ट्र
....................................

Monday, 5 March 2018

मदिरेस कारण की!

किस्सा किमान पंधरा वर्षांपूर्वीचा. एक कॉलेज ग्रुप, वेगवेगळ्या शहरातून आलेली मुले-मुली आणि त्यांच्या गप्पा. विषय दारू पिण्याचा सुरू होता आणि बोलता बोलता एका मुलीने सांगून टाकले. ‘मै और मेरे पप्पा साथ बैठकर ही पिते है’. काही जणांसाठी हा बॉम्ब होता, काही जणांसाठी शॉक. विशेषतः लहान गावांमधून आलेल्यांसाठी जरा जास्तच. आणि तेवढ्यात एक टिप‌िकल मराठी घरातून आलेली मुलगी बोलून गेली, ‘मी पण पिते कधी कधी’. आता एकंदर तिच्या आर्विभावावरून सगळ्यांच्याच लक्षात आले होते की हे फक्त सांगण्‍यासाठी आहे आणि प्रत्यक्षात काहीच नाही. पण, तिच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज त्यातून येत होता. मुली दारू पितात की नाही किंवा का पितात हे सांगण्यासाठी हा किस्सा बराचसा प्राति‌निधिक आहे.
आज पंधरा वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे. मुलींचे दारू पिणे आता अप्रूपाचे राहिलेले नाही. तरीसुद्धा वरच्या किश्‍श्यातील मानसिकताच प्रामुख्याने सर्वत्र आढळते. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आपण ‘मागास’ वाटू नये, या भावनेपोटी अनेक मुली दारू पिण्यास सुरुवात करतात. आता याला काही ‘श्रीगणेशा करणे’ म्हणता येणार नाही, पण सुरुवात होते ती मित्र-मैत्रिणींच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबावातूनच. या व्यतिरिक्त मुली आण‌ि महिला का, केव्हा, कुठे, कधी, कोणती दारू पितात याची विविध कारणे आहेत. वीस वर्षांपूर्वी फक्त मोठ्या शहरांमध्ये असलेल्या पद्धती आता नव्याने मेट्रो होऊ बघणाऱ्या लहान शहरांमध्येही रुजू लागल्या आहेत. रुळल्या आहेत. मुलगा/मुलगी हा भेदाभेद आता इथेही राहिलेला नाही, दारू प्रकृतीसाठी हानीकारक असली तरी!
मुलींच्या दारू पिण्यामागे तथाकथित उच्चभ्रू जीवनशैलीची असोशी ही सर्वच वयोगटांमध्ये दिसून येते. याच जीवनशैलीचा भाग म्हणून आयुष्यात दारूचा प्रवेश होतो आणि मग त्याची सवय होते. लहान ठिकाणांहून आलेल्या, कमावत्या झालेल्या आणि हातात पैसा खुळखुळत असलेल्या मुली उत्सुकता म्हणून सुरुवातीला दारूची चव घेतात. किंबहुना, मुलांप्रमाणेच सगळे ‘शौक’ करता आले पाहिजे, ही उत्सुकताच अनेकींच्या आयुष्यात या व्यसनाचा प्रवेश करविते. कधी ग्रुपबरोबर तर कधी बॉयफ्रेंडबरोबर मग मद्यप्राशन सुरू राहते आणि हळूहळू अंगवळणी पडते. त्यातही केवळ दारू पिण्यापुरता हे मर्यादित नाही तर याचा संबंध पब आणि पार्टी कल्चरशी जास्त आहे. मॉडर्न अॅपेरल्स आणि अॅक्सेसरीज असताना दारू पिण्याचा ‘मॉडर्न’ अॅटिट्युडही अंगवळणी पाडला जातो. आणि केवळ मुलीच का, अनेक महिलांची दारू पिण्याची सुरुवातही नवऱ्याबरोबर झाली असल्याचे दिसून येते. कधी कॉर्पोरेट तर कधी उच्च जीवनशैलीचा भाग म्हणून तर कधी दोघांनी कधीतरी एन्जॉय करावयाचे म्हणून दारू प्यायली जाते. नंतर नंतर त्याची सवय होते आणि मग तर महिलांची ही सवय सोडविता सोडविता नवऱ्यांच्याही नाकी नऊ आल्याची उदाहरणे आहेत.
दरम्यान, दारू पिण्याला बंधमुक्त जीवनाचा संदर्भही तथाकथित सामाजिक चळवळीतून नकळत जोडला गेला. मुली-महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आणि शिक्ष‌ित होणे यासाठी चळवळी झाल्या आणि त्या योग्यच होत्या. पण, हे करता करता दारू किंवा ड्रग्ज यांचाही संबंध अप्रत्यक्षपणे मुलींच्या मुक्त जगण्याबरोबर जुळविला गेला. ‘रिबेल’ आधुनिक नायिका दाखवायची म्हणून चित्रपटातून ती दारू रिचविताना दाखविली जाऊ लागली. स्त्री-मुक्तीचे बऱ्यापैकी उथळ सांकेतिकीकरण करणारे हे चित्रण वैयक्तिक आयुष्यात उतरले नसते तर नवलच. त्याची उदाहरणे आजूबाजूच्या समाजात दिसत आहेतच.
बाय द वे, मुली नेमक्या काय पितात, हा प्रश्नही उत्सुकतेचा असतो. सामान्यतः रम, व्होडका, जिन, टकिला आणि विशिष्ट पार्टीत वाइन याभोवती साधारणतः मुली-महिलांचे मद्यजीवन ‘घुट’मळत असते. कधीतरी बीअर किंवा मग साहसाची फारच आवड असेल तर इतर प्रकारांकडे मोर्चा वळतो. व्होडका हा मुलींमध्ये पॉप्युलर आहे, असे म्हणता येईल. असो. कामाचा ताण आहे म्हणून जसे पुरूष दारू पितात तेच कारण देत मुलीही कॅन्स आणि पेग्ज पोटात ढकलत असतात. ताण हा आधुनिक जीवनशैलीचा भाग आहेच. त्यामुळे तो हाताळण्यासाठी काही लोक जसे पंचकर्म किंवा योगाचा आश्रय घेतात तितक्याच सहजपणे काही जणांना दारूचा आसरा घ्यावा वाटतो. अनेक मुलींच्या दारू पिण्यामागे हेही कारण आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्ज सेवनासाठी सोबत म्हणून मग दारू घेतली जाते, अशीही अनेक उदाहरणे आढळून येतात.
इंटरनेटवर धडे दारू पिण्याचे
दारू पिण्याचे शास्त्रशुद्ध धडे देण्याची सर्व साधने इंटरनेटवर उपलब्ध आहेत. विविध व्हॉट्स अॅप ग्रुप, फेसबुक पेजेस यावर कोणती दारू केव्हा, कशी, किती प्यावी याचे सर्व प्रकारचे मार्गदर्शन मिळते. हे सांगणाऱ्या स्वतंत्र वेबसाइट्स उपलब्ध आहेत. एकदा तुम्ही त्या वर्तुळात गेले की दारू आणि इतर मादक पदार्थांबद्दल सर्व प्रकारची माहिती देणारे अनेक ‘विक‌िपिडिया’ या आभासी जगात उपलब्ध आहेत. या सगळ्यांच्या मदतीने मुलींचे उच्च ‌शिक्षण आणि दारू पिण्याचा प्रवास सुरू राहतो.
हे तर ‘स्टाइल स्टेटमेंट’
आपल्याकडे दारू न पिणारा हा ‘मागास’वर्गीय समजला जाऊ लागला त्याला आता दशकभराचा कालावधी उलटला आहे. मुलींच्या दारू पिण्यामागेही बहुतांश वेळा हेच ‘स्टाइल स्टेटमेंट’ आहे. या विषयावर मुलींशी किंवा त्यांच्या गोतावळ्यातील मुलांशी बोलल्यास हे अधिकच स्पष्ट होते. विशेषतः नव्याने मोठ्या होऊ लागलेल्या शहरांमध्ये तर हे जास्तच लागू होते. आपण क‌िती कूल आहोत, हे सांगण्यासाठी मुलींना दारू प्यावीशी वाटते आणि ती प्यायला जाते, हे चित्र थोड्या फार फरकाने सगळीकडे सारखे आहे. आणि म्हणूनच, दारूच्या दुकानांमधून दारू नेणाऱ्या मुली हे चित्र सर्रास दिसू लागले आहे. हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड पडली की हमखास मुली आढळतात आणि त्यांनी दारू प्यायली असते, हे वास्तव आहे. बंधमुक्त जीवनशैली आणि तथाकथित क्रांतीचे चित्र रंगव‌िल्यानंतर दारू तुम्हाला वेगळ्या जाळ्यात अडकवत नेते. कॉलेजेस, बार, ‌हुक्का पार्लर, कट्टे, लाऊंज यांच्यापासून ते दिवाणखाना आणि शयनगृहापर्यंत अनेक ठिकाणी हे चित्र आणि त्यातील वास्तवच गडदच होत चालले आहे.
आणि म्हणून दारू पितो...
- मित्रांबरोबर राहून दारू पिणे सुरू झाले. आता दारूची भीती वाटत नाही. अनेकदा ग्रुपमधील मुलांकडूनच दारू मा‌गविली जाते.
- सवय लागल्याने रोज दारू प्यायला जाते.
- घरापासून दूर, वसत‌िगृह, स्वतंत्र खोल्यांमध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये जास्त प्रमाण.
- मुलींच्या नकळत मित्र त्यांना मादक पदार्थ देतात. त्यात दारू आलीच.
- ‘कूल’ आहोत हे दाखविण्यासाठी.
- टेन्शन कमी करण्यासाठी. जे कामामुळेही येते आणि ब्रेकअपमुळेही.

परवा पुस्तकांचे कपाट उघडले आणि पुन्हा एकदा तो जादूचा प्रदेश माझ्यासमोर हात पसरून उभा झाला. पुन्हा एकदा  पुस्तकांचा गंध पानाप्नातून दरवळत माझ्या आत पर्यंत शिरला. तीच ती ओळखीची पुस्तक मला खुणावू लागली आणि आपसूकच हात त्यांच्याकडे वळले. त्याच त्या पुस्तकांची तीच ती जुनी पण चालताना, वाक्या गणिक आणि अक्षरा गणिक ओळखीच्या खुणा पटू लागली, नाती-गोती उजळू लागली. आणि एकदम आश्चर्य वाटला. गेली कित्येक वर्ष मी हे करतो आहे. असाच कपाट उघडून बसतो, अशीच पुस्तक चालत बसतो आणि असाच उगाच काही तरी वाचत, आठवणींमध्ये गुंगून जातो. आठवत पण नाही किती वर्ष झालीत.
केव्हा लागला हे वाचनाचे  वेड? खरच नाही आठवत. हा पण एक आठवतं. लहानपणी पासूनच मी खूप वाचायचो. जे दिसेल ते. वृत्तपत्रापासून ते रस्त्यावरच्या जाहिरातींच्या होर्दीन्ग्स पर्यंत. काय वाटेल ते! पुस्तक दिसली कि हुरळून जायचो, लहान मुल खाऊ किंवा खेळणी दिसली कि हरखून जातात तसा. सहावीत असताना आम्ही महाराष्ट्र दर्शनासाठी गेलो होतो. ज्या ज्या ठिकाणी गेलो आणि जिथे जिथे पुस्तकांची दुकाने दिसली , तिथे तिथे पुस्तक चाळली आणि आई-बाबांकडे हट्ट केला. पुस्तक पाहिजेच. आणि प्रत्येक वेळी त्यांनी मला पुस्तके आवर्जुन घेऊन दिलीत. बाहेरगावी गेल्यावर घरी परततांना त्यांनी स्वताहून माझ्यासाठी पुस्तके आणलीत. माझ्या पालकांचे हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. त्यांच्यामुळे मी वाचनाचा आनंद काय असतो हे अनुभवू शकलो.
वाचन का करावे, त्यचे उपयोग काय आहेत, त्यानी काय काय लाभ होतात या वर लांब लचक भाषण ठोकता येईल, दाखले ही देता येतील. पण मला असे वाटते कि वाचनातून जर काही मिळवायचे असेल तर, आनंद मिळवावा. आनंदासाठी वाचन करावे. वाचनातील आनंद काय असतो हे शोधून काढावे. म्हणजे मला
विचाराल तर सकाळी उठल्यावर चहा घ्यायचा, पुस्तक हातात घेऊन लोळत वाचत पडायचं, उठून आंघोळ वगैरे आटपायची, पुन्हा वाचत बसायच.    मग दुपारच जेवण, पुन्हा वाचन, मग झोप, वाचन, जेवण, वाचन आणि असाच क्रम सुरु! पुस्तकाऐवजी पेपर, मासिक किंवा दुसरे काहीही चालेल. मला वाचत बसायचा, लोळायचा पगार कुणी तरी देतो आहे आणि मी आयुष्यभर वाचत आहे असे स्वप्न तर मी किती तरी वेळा बघितले आहे. काश, यह सपना सच होता!!!
वाचनाने मला काय नाही दिले? आनंद दिला, अनुभवांचा आस्वाद घेणं शिकवलं, द्रुष्टिकोन दिला, विचार दिले, घटनांकडे बघण्याची नजर दिली, माणसे वाचण्याची सवय आणि आवड लावली, नवनवीन अनुभवांना सामोरं गेलं पाहिजे हा विचार दिल. मुख्य म्हणजे माणूसपण दिलं आणि माणसांचे महत्व ओळखायला शिकवलं. बाकी भाषण देण्यासाठी संदर्भ दिलेत वगैरे हे अतिरिक्त उपयोग!!!
असं असूनही मला खरोखर असं वटात की, अनेक उपयोग आहेत म्हणून कुणी वाचन सुरु करणार नाही. मला विचारलं तर मी हेच सांगेल, की बाबा रे आनंदासाठी वाच. discover it !!! वाचनातील आनंद काय असतो हे तू तुझे शोधून काढ. तो आनंदाचा शोध प्रत्येकाला लवकरात लवकर  लागो, हीच सदिच्छा!!

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...