Wednesday, 3 October 2018

मि. गांधी, इटस फॉर यू!



मि. गांधी, अभिनंदन. तुम्ही १५० वर्षांचे झालात. केक पाठवतोच तुम्हाला, पण म्हटलं चला जरा गप्पा पण मारून घेऊया. तसं तुमच्या बर्थडेलाच लिहिणार होतो . पण, तेव्हा भक्तीचा महापूर आला होता. सोचा, भक्तीरसाचे पाझरणे थोडे थांबू देऊया, मग तुम्हाला एक कॉल मारू! आता कसं आपल्याला दोघांनाही फुरसत आहे. ते काय आहे ना,  माझ्यातच थोडा प्रॉब्लेम आहे. असा एका कोणत्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात राहून राहून गहिवर दाटून येत नाही. मग ते तुम्ही असा, सावरकर असा नाही तर हेडगेवार असा. राम-कृष्णाबद्दलच आपलं असं भक्तीचं नातं नाही, त्यामुळे तुम्हा कुणाबद्दल असण्याचा काही प्रश्नच नाही. आता, यात तुम्हा कुणाचा अनादर करण्याचा काही हेतू नाही हो बावा.! नाही तर घ्याल मनाला लावून. पण, त्याचं काय आहे ना, ‘अखिल भारतीय देव बनवा संघटने’चे आपण चार आण्यांचे सुद्धा सदस्य नाहीत. मग तो देव कोणताही असो. पण, म्हणून तुम्हा कुणाबद्दल राग नाही, हे नक्की! म्हणजे काय होतं ना, की कुणी असं ‘बापू’ वगैरे म्हटले, की कानावर हात ठेवून किंकाळणारी निरुपा रॉय नाही तर ए.के. हंगल आपल्याला आठवतात. सो ते राष्ट्रपिता, बापू वगैरे काही मला जमलं नाही. जसं मला देव नामक एन्टिटीपुढे कर्मकांड करणं जमत नाही, तसंच!
पण, तुम्ही मला राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक नेते म्हणून निश्चितच भावता. तुम्ही सगळेच. त्यातही मि. गांधी, तुम्ही तुमच्या समकालीनांपेक्षा सरसच होता. राजकारणी हा चतुर, धूर्त, लोकांची नस ओळखणारा, लाट तयार करणारा, लाटेवर स्वार होणारा, योग्य वेळी भूमिका नव्वद अंशाच्या कोनातही बदलण्याची तयारी असणारा असावा लागतो. तुम्ही असे होतात. समाजशास्त्रांचा, माध्यमशास्त्राचा आणि पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे कितीतरी वेळा बघतो, विचार करतो. पॉलिटिकल कम्युनिकेशन नावाचा प्रकार तुम्ही काय प्रभावीपणे हाताळलात.! समाजातील बहुसंख्यांना काय अपिल होईल याचं तुमच्या इतकं अचूक ज्ञान तुमच्या समकालींनापैकी कुणालाच नव्हतं, असं आता वाटतं राहत. राजकारण करताना प्रतिके तयार करणं खूप महत्वाचं असतं. या प्रतिकांमधून सामान्यांपर्यंत संदेश पोहोचवायचा आणि त्यांना आपल्याशी जोडून घ्यायचं हे कसबी राजकारण्याचं कौशल्य असतं. मि. गांधी, तुम्ही यात खूपच वरचढ होतात. ते तुमचं पंचा नेसून असणं, आत्म्याचा आवाज, चरखा, मिठाचा सत्याग्रह, प्रभात फेरी, उपोषण आणि त्यागमूर्तीवाली प्रतिमा. सगळंच अप्रतिम!
भारतीय मनाला त्यागाचं, साधेपणांचं पूर्वापार अप्रूप आहे. तुमच्याही पूर्वीपासून. ऋषी, मुनी किंवा संतपरंपरेतून आलं असेल का ते. तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. तुम्ही ते अप्रूप बरोबर हेरलं. आयुष्यभर पंचा स्वीकारणे सोपे नाहीच पण ती झाली दिसणारी कृती. त्या कृतीतून तुम्ही राजकीय नेते म्हणून ज्या खुबीने लोकांशी स्वत:ला जोडून घेतलं, ते लाजवाब होतं. तीच बाब चरख्याची, खादीची, प्रभात फेरींची, उपोषणांची! चरखा चालवून आणि येथे खादी घालून काही मँचेस्टरच्या कापड गिरण्या बंद पडल्या नसत्या. इंग्रजांनी आणखी कोणत्या तरी देशात कापूस उगवून त्या चालविल्याच असत्या. म्हणजे भारतीय लोक त्यांचे कपडे घालीत नाही म्हणून काही इंग्रज उद्योगपती रस्त्यावर नसते आले. अशी आपली कितीशी पर्चेसिंग पॉवर असेल तेव्हा. आजच्या सारखी मार्केट म्हणून देखील आपली गणना नव्हती. म्हणजे मला माहिती नाही, पण असलं काही लॉजिकल आणि माहितीपूर्ण तुमची भक्तमंडळी आमच्यासमोर सहजपणे आणत नाही. येतात ते तुमचे संतत्वाचे आणि भक्तीचे उमाळे. त्यात काही आपल्याला इंटरेस्ट नाही.
हा तर मुद्दा चरख्याचा आहे आणि सगळ्या प्रतिकांमधून तुम्ही साधलेल्या राजकीय संप्रेषणाचा किंवा जनसंवादाचा आहे. लोकसंग्रह करावयाचा आणि त्याला क्रियाशील करायचे, त्यासाठी बहुसंख्य लोकांना सहजपणे करता येईल असा कार्यक्रम देणे आवश्यक असते. लोकसंग्रह आणि संघटनशास्त्रामधील अगदीच बेसिक नियम. चरखा कातण्यासारखं कुणालाही करता येणारं, खादीसारखं क्रांतिकारी फिलिंग देणारं सोप्पं काम तुम्ही स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलं. भगतसिंह किंवा सावरकरांचा मार्ग चोखाळणं प्रत्येकाच्या आवाक्यातलं नव्हतं. इतक्या मोठ्या समर्पणाची तयारी सगळ्यांची नसते. पण, सोप्पं काम दिलं की लोकं आपल्याला जास्त प्रतिसाद देतात हे तुमच्यातील लोकनेत्याने अचूक ओळखलं होतं. प्रभावीपणेही राबविलंही. तुमचं यश सगळ्यांसमोर आहे.  बॉस, आपकी इस अदा पें हम फिदा है! याला जोड तुमच्यातील व्यवस्थापन कौशल्याचीही. माणसांपासून ते संसाधनांपर्यंत, आश्रमापासून ते काँग्रेसपर्यंत सगळ्यांचच व्यवस्थापनही अभ्यासण्यासारखं वाटत राहतं
इतका मोठा देश, कम्युनिकेशनची कोणतीही प्रभावी साधनं नसताना स्वत:शी जोडून घेणे, हा जोक नव्हता. यू डीड इट.! इतका जबरदस्त पॉलिटिकल कम्युनिकेटर आपल्या देशाने आजवर बघितलेला नाही. सो आपला सलाम, तुमच्यातील त्या चतुर राजकारण्याला, संवादशास्त्रावर अचूक पकड असलेल्या व्यक्तीला.
तर, मि.गांधी, भेटत राहूच. तुम्हीही भेटत राहा. भक्तांची रांग जेथे संपेल, तिथून थोड्या दूर अंतरावर  उभा आहेच मी. सवड मिळाली की मिस्ड कॉल द्या नाही तर हात दाखवा. बसू गप्पा मारत.! फॉर नाऊ, बाय बाय!
…………………………………

Sunday, 30 September 2018

मौनाची रुपं हजार…!



डिसेंबर महिन्याची संध्याकाळ… किंवा रात्र म्हणा.. मेळघाटातील गारेगार वातावरणात आम्ही तीन मित्र निघालोय गाडीतून. आजूबाजूच्या जंगलात मिट्ट् काळोख भरलेला आणि रस्ता सुनसान. सहज म्हणून एका ठिकाणी गाडी थांबविली आणि तिघेही बाहेर आलो. वर मोकळं चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि वातावरणातला सॉलिड गारवा. अशा वेळी गझलगायक मित्र आल्हाद काशीकरच्या अंगात जगजित सिंगांचं वारं घुसलं नसतं तरच नवल. तो ‘जिंदगी धूप तुम घना साया’ गुणगुणू लागला आणि गंधर्वाच्या घरचं जेवण जेवलेल्या विकास केमदेवांनी सुमोच्या बॉनेटवर ताल धरला. पुढचा अर्धा तास जगजितसिंहांनी आम्हाला भारून टाकलं होतं. आल्हादचा सूर थांबला तसा केमदेवांच्या ठेक्याने विराम घेतला आणि  जाणवलं, आता अंतर्बाह्य व्यापून टाकण्याची जबाबदारी मेळघाटी शांततेने घेतली आहे.  पुढची काही मिनिटं ते मौन अंगात पाझरत होतं, अचानक आपलं सगळं अस्तित्व मौनात विरघळत चाललंय अशी जाणीव दाटून राहिली आणि अंधारभारलं मौन नखशिखांत व्यापून उरलं.
मौन कायमच भावत आलंय मला. पाऊस जसा प्यारा, तितकंच आकर्षण मौनाचंही.  आणि त्याच्या भिन्न भिन्न आविष्कारांचंही. अहिंसेच्या प्रॉडक्टला गांधीजींनी ब्रँड बनवला तसा मौनाला विनोबांनी ग्लॅमर मिळवून दिलं. पण, कुठलंच मूल्य एका व्यक्तीचा कॉपीराइट कसा असेल? मूल्य तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे अनुभवायचं असतं. मूल्याची अंतर्भूत ताकदच जगणं व्यापून टाकण्याची असते आणि मौनाची तर निश्चितच असते. मौनाची अशी कवेत घेणारी  रुपं आपल्यापैकी सगळ्यांनाच तर येऊन भिडत असतात जागोजागी, क्षणोक्षणी!
कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या इतिहास विभागात बसलो होतो. सोबतीला विज्ञान आणि पावसाचे कॉपीराइट ओनर मयुरेश प्रभुणे होतेच. विद्यापीठात शिरतानाच कमालीचा उकाडा जाणवत होता आणि अवघ्या अर्ध्या तासात काळोख दाटून आला. विद्यापीठाच्या लाल विटांच्या भिंतीच्या बॅकड्रॉपवर पाऊस काळोख दाटून आला. विद्यापीठाच्या लाल विटांच्या भिंतीच्या बॅकड्रॉपवर पाऊस सरसरा कोसळू लागला. तिथल्याच एका पॅसेजमध्ये उभा राहून पाऊस बघत होतो आणि समोरच्या बसक्या इमारतीवर मोर येऊन बसला. गपगुमान पिसारा गुंडाळून पाऊसधारांमध्ये भिजत उभा होता. पाच मिनिटे, दहा मिनिटे करीत तब्बल अर्धा तास पावसाचा नाद निनादत होता, तो मोर भिजत होता आणि मी अवाक्षरही न बोलता तो पूर्ण वेळ हा अनुपम सोहळा बघत शांत होत होतो.
कुरुक्षेत्रात असंख्य धार्मिक स्थळं आहेत. लोक दर्शनाला येत राहतात, आपण लोकांचं दर्शन घेत राहावं, असा काहीसा खेळ चालला होता. समोर काही अंतरावर उंचापुरा, एकच एक भगवी कफनी घातलेला माणूस उभा होता. का कुणास ठाऊक पण त्याच्यावर नजर खिळली होती. आणि एकाएकी त्या माणसाने उभ्या उभ्याच भर गर्दीत आपला शरीरधर्म पार पाडला. उगाच आडपडद्याने का बोला, त्याने तेथेच विष्ठा केली. अंगावर सरसरून काटा आला. जिताजागता माणूस समोर आहे, पण त्याचं अस्तित्व आहे काय अन् नाही काय? असून काही उपयोग नाही.. नसून कुणाला दु:ख नाही. जिताजागता माणूस. मानवी अस्तित्व अर्थहीन असल्याची भावना एकाएकी भीतीसारखी अंगभर पसरली. अर्थहीनतेचा हा अनुभव यायलाही महाभारताच्या कुरुक्षेत्रातच यावे लागले, हा योगायोगच समजावा का? त्या एका अनुभवाने सुन्नच झालो. सुन्नपणा हे ही मौनाचेच रुप म्हणावे का? की सुन्नपणाची परिणीती मौन?
जंगलातून जाताना, पर्वताच्या कड्यावरून दूरवर नजर फेकताना, कच्छच्या कच्छच्या लांबच लांब रस्त्यावर बसकण मारली असताना, मौन भेटत राहिलं, मौन व्यापत राहिलं. मौन भारत राहिलं. पानिपतापासून काही अंतरावर ‘काला आम’ नावाची जागा आहे. पानिपतच्या तीनही युद्धांची आठवण म्हणून तेथे स्मारक उभे राहिले आहे. स्थानिकांसाठी तो जॉगर्स पार्क आहे. आपल्या मराठी मनासाठी तो तसा कसा असू शकेल? मयुरेश आणि मी ते सगळं बघून झाल्यावर एकही अक्षर न बोलता केवळ मावळतीचा सूर्य अंगावर घेत बसून राहिलो. लाख मराठ्यांचा गहिवर आला होता का दाटून, माहीत नाही. कुरुक्षेत्र आणि पानिपत ही नरसंहाराची दोन प्रतिकं आजूबाजूला असणे हा योगायोग अंगावर येत होता का, माहीत नाही. आमच्या अवतीभवती कोण होतं, माहीत नाही. त्या सायंकाळी मौन तेवढा मनात रेंगाळत बसलं होत, इतकंच काय ते आठवतं.
इतक्या ठिकाणी, इतक्या जागी फिरलो. दर वेळेला या मौनाचं आकर्षण वाढत गेलंय. अनेकविध रुपात ते भेटत आलंय, मौनाचं गारुड कायम राहिलंय. मध्यंतरी काही ओळी वाचल्या होत्या....

क्षितिज उभे डोळ्यात सांजते,
चंद्र उन्हाची नसांत शिंपण
गोकुळात वाळूत चालते
रात्ररात्र शब्दांची गुंफण!

राधा-कृष्णाच्या प्रेमाचे वर्णन करणारे हे शब्द सुंदरच आहेत.  पण, मनात विचार आला. राधा-कृष्णाला शब्दांची गरजच भासली नसेल. एकरूप होते म्हणतात ना ते! रात्र रात्र भर, वाळून बसून, त्यांची शब्दांची नव्हे, तर मौनाचीच गुंफण चालत असावी. त्यांचे मौनच इतके बोलके असावे की शब्दांचा अनावश्यक भार नकोसाच वाटत असणार. कुणास ठाऊक? रेंगाळत असेल का तेथेही आजही असे मौन. जाऊन बघावे का एकदा कालिंदीच्या काठावर? मौनाचं ते दिव्य रूप बघायला…. आणि मग मौनात विरून जायला….!

Sunday, 22 July 2018

आगुंबे झिरपलंय तना-मनात!



‘स्वदेस’ बघितला असेल ना! शाहरुखवाला.. चेक्सचे मस्त शर्टस घातलेला मोहन.. आणि ती गायत्री जोशी. म्हणजे कांदे-पोहे वाला कार्यक्रम करायचाच असेल तर हिच्यासाठी करावा, अशी वाटणारी गायत्री! ते वाईचे काठ, नासा बॅकग्राऊंड, ‘यूँ ही चला चल’ म्हणणारा मकरंद देशपांडे… बहोत कुछ था! या सगळ्या गर्दीतली ती ‘कावेरी अम्मा’ आठवते का? शाहरुखला सांभाळणारी… दाक्षिणात्य टोन घेऊन बोलणारी. तर सांगायचंय हे की माझ्यापुरती ही कावेरी अम्मा फक्त  पडद्यावर मर्यादित राहिली नाही. अशीच एका कावेरी अम्मा मला प्रत्यक्षातही सापडली होती. तशीच क्रीम किंवा कुठल्या तरी हलक्या रंगाची दाक्षिणात्य साडी नेसणारी. तशीच मार्दवाने बोलणारी पण कर्तेपणाचा अलंकार ल्यालेली. ती ही पार पश्चिम घाटात, कर्नाटकात. आपण विदर्भात म्हणतो ना तसल्या छटाकभराच्या गावात.. अगुंबे नावाच्या!
भारतातील सर्वात जास्त पाऊस ज्या काही ठिकाणांवर पडतो त्यातले एक अगुंबे! पाऊस धो..धो पडतो म्हणजे काय होतं ते अगुंबेत अनुभवावं.. पाच वर्षे झाली जाऊन तिथे… चित्र धूसर झालंय..पण ते पावसाचं पाणी पापण्यांवर पडल्यानंतर होत तसं… डोळे मिटून घ्यावे आणि तो पापण्यांवरचा थेंब अनुभवावा तसं अगुंबे आठवतंय. घाटातील वळणदार रस्ते चढून या डोंगराळ गावात पोहोचलो तो जुलै महिना होता. म्हणजे तिथला सर्वाधिक पावसाचा महिना.. सरासरी २५०० मिमी पेक्षा जास्त पावसाचा.  गावाला मध्यभागी छेदणारा पायवाटेपेक्षा जरासा मोठा रस्ता. आणि दोन्ही बाजूला कौलारू घरे… याच रस्त्याच्या सुरुवातीला अगुंबेच्या कावेरी अम्माचे घर होते. लाकडी जुने बांधकाम, पुरुषभर उंचीची भलीमोठी दगडी ओसरी. बसायला लाकडी बाके अन् खुर्च्या.. जाड महाग लाकडाचे नक्षीदार दार आणि वाकून आत प्रवेश केला की भला मोठा चौक.. वर छप्पर नसलेला आणि उघडं आकाश किंवा चांदणं थेट अंगावर घेणारा. आम्ही होतो तेव्हा या चौकात पाऊस धाडधाड कोसळायचा आणि उतरत्या छपरांवरून धारा ताल धरत नाचायच्या. उतारावरून कोसळणारा थेंब फुटण्याचा खेळ निवांत बघत राहावं, अशी जागा. चौकाच्या मध्यभागी आपल्या सर्वांच्या कल्पनेत रुतलेलं हुबेहूब तुळशी वृंदावन आणि चौकाच्या सभोवताल सगळ्यांच्या राहण्याच्या खोल्या.
घरच्या मुख्त्यार असलेल्या,  सावकाश पावले टाकीत, आपला भारदस्त देह सांभाळीत घरभर फिरणाऱ्या कावेरी अम्मांचा दरारा त्या वाड्यात सर्वत्र जाणवायचा. गावची पाटलीण असते, तशा त्या गावातील प्रमुख होत्या. भरल्या घराचा अनुभव देणारा तो वाडा. ओसरीवर बैठे खेळ खेळणाऱ्या परकर-पोलक्यातील मुली, आरामखुर्चीवर पेपर वाचत बसलेले काका, अखंड जपमाळ खेळविणारी वयस्क आजी आणि काम करणाऱ्या बायका. या सगळ्यांवर कावेरी अम्मांचा धाक, वरदहस्त आणि वरचष्माही होता.  पहाटे पाच वाजता उठून ही बाई त्या वाड्याचा कारभार हाती घ्यायची तो रात्र ओसंडून निजेपर्यंत. अख्ख्या घरावर जुन्या घरंदाजपणाची आणि हातून निसटून चाललेल्या लोभस गतकालाची छाप होती. वापरण्याच्या भांड्यांपासून ते पाणी तापवण्याचा भल्या थोरल्या बंबापर्यंत अनेक गोष्टी तांब्याच्या. न्हाणीघर इतकं मोठं की पाय पसरून झोपावं. वाड्याचे रुपांतर होम स्टे मध्ये झाल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी काही कायमच्या सोयी. वरच्या मजल्यावर बाहेरच्यांची राहण्याची सोय. गज असलेल्या जुन्या खिडक्या. कमीतकमी प्रकाश आणि सकाळच्या वेळी खिडकीतून येणारी सूर्यकिरणांची तिरिप. सबंध वातावरणातील भिजलेपण वाड्याच्या रंध्रारंध्रात भिनलंय असं सारखं वाटत राहायचं.
या वाड्यात दोन की तीन दिवस राहिलो. केळीच्या पानांवर वाढला जाणारा गरमागरम भात, त्याचे वेगवेगळे प्रकार, नेहमीच्याच पण दाक्षिणात्य पद्धतीने केलेल्या भाज्या, लोणची आणि पापड. या सगळ्यांच्या जोडीला कावेरी अम्मा आणि तिच्या धाकाने इतर महिलांनी आस्थेने केलेली वास्तपुस्त. आगुंबे अनेक अंगांनी आणि रंगांनी आत उतरलंय.
आगुंबेतील घरही मोठी वैशिष्ट्यपूर्ण, छोटेखानी, उतरत्या छपरांची आणि अफलातून रंगांची! त्या संबंध पश्चिम किनारपट्टीवरील घरांच्या रंगांचं मला मोठं अप्रूप आहे. कोकणापासून केरळापर्यंत फिरताना घरांची विशेष रंगसंगती माझे लक्ष वेधून घेते. म्हणजे आपल्याकडे रंग लावताना जरा हलका, क्रीम कलर हमखास मिसळलेला अशी घरं दिसतील. तिथे म्हणजे फिक्का रंग वगैरे प्रकारच जगात अस्तित्वात नसावे असं वाटत राहात. भडक लाल, पिवळा, जांभळा वगैरे एकदम डेंजर लाईक कलर्स. अनिल शर्माच्या एकाच पिच्चरमध्ये नाही का अमरिश पुरी, डॅनी, प्रेम चोप्रा असे डेंजर डेंजर लोक राहायचे. तसे एकाच रंगात सगळे हे भडकभुडक कलर्स.. पण मला मजा येते ही घरं बघताना. आगुंबेतही तसलंच काहीसं चित्र होतं. आम्ही गेलो तेव्हा लोक शाकारणी करीत होते. गावाच्या मध्यभागी पडकी दगडी शाळा आणि त्याला वळसा घालून गेलं की एक मोठा रस्ता आणि काही लहान गल्ल्या. गावं संपल्यात जमा. कुठेही उभे राहा, असंख्य पक्ष्यांचे असंख्य अनोळखी आवाज.
मालगुडी डेज आठवते का? त्यातील काही एपिसोडसचं शुटिंग या गावात झालं होतं. आणि घरातलं शूटिंग थेट कावेरी अम्माच्या वाड्यातच. म्हणजे आम्ही तीन दिवस जेथे राहिलो त्याच वाड्यात. मालगुडी डेज आणि आर. के. नारायण यांचं आपल्याला आकर्षण असतं. विशेषत: दूरदर्शनवर पालनपोषण झालेल्यांना तर नक्कीच! त्याच वाड्यात आपण राहतोय म्हटल्यावर का कुणास ठाऊक पण लय भारी वाटत होतं.
निघण्याच्या काही तास अगोदर कावेरी अम्मांना म्हटलं, तुमच्यावर लिहिणार आहे मी, बोलायचंय. ‘माझ्यावर काय बोलायचं अन‌् काय लिहायचं’. पण, तरी त्या बोलल्या. सकाळची सगळी कामे बाजूला ठेवून. तिखटा-मिठाच्या आणि मसाल्यांच्या भल्या-थोरल्या डब्याशी खेळत. घड्याळात सकाळचे सहा वाजले होते तेव्हा बोलणे सुरू केले. थांबलो तेव्हा तास उलटून गेला होता.
आगुंबे गावाचा परिसर ‘रेड कॉरिडॉर’ च्या पट्ट्यातील. माओवादाने प्रभावित. सुरक्षा दलाचं लक्ष कावेरी अम्माच्याही वाड्याकडे असतं. ‘ते लोक येतात का?’. बाई बोलेनात. ३-४ वेळा विचारल्यावर म्हणाली,‘ तू आलास-जेवलास ना. तसं आणखी कोण कोण येत राहातं. प्रत्येकाला कसं  विचारणार’. मी मग पुढे काही रेटलं नाही.
कर्नाटकात आयुष्य गेलेली ही बाई, अस्खलित मराठीत बोलायचं. कानडी हेल काढत. सानुनासिक. कारण, तिचं मूळ मराठी होती. कारण ती कावेरी अम्मा नव्हती. तिचं खरं नाव होतं. कस्तुरी अक्का शेणॉय!
२०१३ मध्ये गेलो होतो. आता बरोबर पाच वर्ष उलटली. धो-धो पडणारा पाऊस, रस्त्यांवरून वाहणारे पाट, चिंब भिजलेली घरे आणि ओसऱ्या. आगुंबेला पुन्हा जाणं होणारही नाही आयुष्यात कधी, पण किंचित कुरळ्या केसांची  सत्तरीची कावेरी अम्मा ऊर्फ कस्तुरी अक्का, तिचा १२० वर्षे जुना वाडा आणि ते अख्खं जग… स्टिल कॅमेऱ्यानं टिपलंय मनाच्या. वारंवार हा अल्बम उघडून बघण्यासाठी!
…………………………….



Sunday, 10 June 2018

हिमाचल के प्यार मे सब जायज है!



पठाणकोट सोडलं आणि काही अंतर जात नाही तोच बनवारीने, गाडीच्या ड्रायव्हरने, एसी बंद केला. तो बंद करायचा अवकाश अन् दिल्ली, हरयाणा आणि पंजाबच्या उन्हाने होरपळलेल्या आणि कॉम्प्लेक्शन गमावू बघत असलेल्या  आमच्या गाडीतील यच्चयावत जीवांनी एकच गलका केला. एसीविना आता आपले कसे होणार ही मर्त्य जीवांना पडणारी काळजीही स्वाभाविकच. ‘पहाडी शुरू हो रही है’, बनवारीने जाहीर केले आणि आपण  हिमाचलच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहोत याची जाणीव झाली. पहाडी शुरू होण्याचे आणि एसी बंद करण्याचे प्रकरण चार वर्षापूर्वीही अनुभवले होतेच. तर, पठाणकोट सोडले आणि उण्यापुऱ्या दोन तासात ‘हवा बदल रही है’ चा अनुभव येऊ लागला. स्वत:च्या मनाला सांगितले, वेलकम टू हिमाचल प्रदेश!

चार वर्षांपूर्वी शिमला,मनालीला गेलो होतो तेव्हा हिमाचलची पहिली नजरानजर झाली होती. त्या नेत्रपल्लवीने डोक्यात टिकटिक वाजवले और प्यार हो गया. तसा मी बऱ्यापैकी भटक्या जमातीचा माणूस आणि भारताच्या १०-१५ राज्यांमधून प्रवासही करून झालाय. पण, हिमाचलच्या प्रेमाची मी लाल किल्ल्यावरून कबुली द्यायला तयार आहे. तसा तर शेरशहा सुरी वाला ग्रँड ट्रंक रोडही मनात ठसलाय, पण त्या फ्लर्टिंगची गोष्ट पुन्हा केव्हा तरी.! गुलमर्गच्या बर्फापासून ते अलेप्पीच्या बॅकवॉटरपर्यंत अनेक गोष्टी सॉलिडच होत्या. पण, शाहरुखला हात फैलावून साद घालायची असेल तर त्याने ती फक्त हिमाचलातच घालावी, असे कायमच वाटत आले आहे. कारण काय तर काही नाही,  हिमाचल के प्यार मे सब जायज है!

प्रवासाबद्दलचे आपले फेव्हरेट वाक्य म्हणजे ‘जर्नी इज ऑलवेज ब्युटिफुल दॅन डेस्टिनेशन’ आणि हिमाचलात तर त्याची जागोजागी प्रचिती येत राहते. माझ्यासारख्या फोटोग्राफी न येणाऱ्या माणसाला हिमाचल नाराज करीत नाही. मोबाइल कॅमेरा काढावा आणि डोंगराच्या कुठल्याही वळणावरून दिसणाऱ्या दृश्यावर तो धरावा, फोटो ओकेच येणार. हिमाचलचे सौंदर्य आहेच तसे! तसेही ज्याने एकदा हिमालय आणि माधुरीचे स्माइल अनुभवले तो यापैकी कोणतीच गोष्ट विसरू शकत नाही. माझ्यासाठी हिमाचलही तसाच आहे. प्रिन्सेस डायना आणि माधुरीच्या कॉम्बिनेशनवाला.

पाइन्स आणि इतर असंख्य वनस्पतींनी हिमाचलचे डोंगर समृद्ध आहेत. या झाडांच्या गळून पडलेल्या पानांचा झाडोरा वाळल्यावर एकदमच आकर्षक दिसतो. काळ्या- चॉकलेटी खोडांची झाडे आणि पिवळे गवत नजरेला अशी काही भुरळ घालते, की आपला एकदम फुल स्वेटरवाला ऋषी कपूर होऊन जावा. मनालीचे हिडिंबा मंदिरही असेच, मनात भरलेले आणि कॅनव्हासभर पसरलेले.

यावेळचा डलहौसीचा टूर म्हणजे तर ऋषिकेश मुखर्जी आणि यश चोपडांचे कॉम्बिनेशन होता. सगळ्या जाणिवा जागृत ठेवून अनुभवले तर डलहौसी मजाच आणते. आम्ही पोहोचलो त्या रात्री सोसाट्याचा वारा आणि अशी काही थंडी होती की बॅगेतले फुल स्वेटर्स काढावेच लागले. आणि दुसऱ्या दिवशीचा भल्या सकाळचा मॉर्निंग वॉकही अप्रतिम.

डलहौसीचा गांधी चौक म्हणजे त्या गावचा मुख्य चौक. हे हिल स्टेशन अद्यापही अंगाखांद्यावर ब्रिटिश खाणाखुणा मिरवतंय. रस्किन बाँडची पहाडी वर्णन वाचून जावीत आणि डलहौसीत ती जोखून बघावी. साधर्म्य हमखास आढळणार. त्या चौकातून एक लहानसे उजवे वळण घेऊन दरीच्या कडेकडेने एक रस्ता पकडला आणि चालू लागलो की वाट हळुवार निमर्नुष्य होत जाते. ज्या कुठल्या कोलाहलातून आपण आलो असेल तो फिका होत जातो आणि अवतीभवतीची शांतता तुमच्या भोवती गुरफटत जाते. मोबाइल आत टाकावा, मोदी-राहुलची आणि आपल्याशिवाय ऑफिसचे काय होणार ही चिंता दूर फेकावी आणि गप तोंड बंद ठेवून चालत राहावे. पहाडी पक्ष्यांचे आवाज, झाडांमधून वाहणारा वारा, दूरवर दिसणाऱ्या टेकड्यांवर उतरलेले धुके आणि आरामात पहुडलेली शांतता हा पुस्तकातील वर्णनांचा भाग उरत नाही. चित्तवृत्ती शांत करणे हे जर अध्यात्म असेल तर हिमाचलची डलहौसी तुम्हाला त्याची जाणीव करून देते. कपडे खराब होण्याची चिंता न करता डोंगर उतारावरील गवतावर बसून जावे, गुमान डोळे मिटून भवताल अनुभवत राहावा. कुणास ठाऊक, कदाचित याच वळणावर स्पर्शून जाईल त्या घनसावळ्याची सावली! हिमाचलमे सब जायज है….

मंदार मोरोणे, नागपूर
७७७५०९५९८६

Monday, 30 April 2018

शेजारच्या छत्तीसगडात!!!


‘‘दादू... झाडू लगा लो... दादू कुलर मे पानी भर दो... दादू कुर्सिया नही लगायी अभी तक.. अरे, दादू कहा हों... मेहमान आ गये.. सामान तो लो’’’... घरात मंगलकार्याची लगबग सुरू आहे. प्रत्येक जण ‘काम मे हाथ बँटा रहा है’ आणि तरीही घराच्या कानाकोपऱ्यातून ‘दादू...दादू’.. आवाज येतो आहे. आणि टी-शर्ट पँटमधला दादू इकडून-तिकडे धावतोय.. अर्धवट टक्कल, बारीक मिशी, कंबरेला पांढरे उपरणे गुंडाळलेला दादू प्रत्येक ऑर्डर झेलण्यासाठी लगबग करतोय आहे. कामे करायला घरात अनेक तरुण आहेत. पण, तरीही सर्वाधिक आवाज दिला जातोय साठीला पोहोचलेल्या किंवा कदाचित ओलांडलेल्या दादूला! आणि तोही कोणतीच हाक व्यर्थ जाऊ देत नाही.. सकाळी  सहाला सुरू झालेली त्याची धावपळ रात्रीच्या जेवणापर्यंत सुरूच राहते. मग तो अंतर्धान पावतो आणि थेट दुसऱ्या दिवशीच दिसतो. आपण उठायच्या आधीच त्याच्या हाती झाडू किंवा टोपले आले असते... टी-शर्टची जागा शर्टने घेतली असते.. बाकी सगळं कालसारखंच असतं दादूचं... दादू बोलणारा रोबोट तर नाही.?.. पण तो फारसा बोलतंही नाही.. एखादा शब्द, फारतर दोन सलग वाक्य. उर्वरित वेळेत फक्त काम.

 मध्येच कुणीतरी अकाली मोठेपण भिनलेलं दादूवर डाफरतं.. सांगितलेलं काम केलं नाही म्हणून... उर्मट शब्दात पाणउतारा करतं.. आणि क्षणार्धात घरच्या सगळ्यात थोरल्या बाईचा चढा स्वर त्या उर्मट स्वराला झापतो.. दादूसाठी. कारण, दादू केवळ ठेवलेला नोकर नसतो, वेठबिगार गुलाम नसतो. दादू, वर्षानुवर्षे घरचाच होऊन गेलेला, नात्यागोत्यात, जातीत नसलेला आप्त असतो. आणि तो त्या एका घराचा नसतो तर अख्ख्या वस्तीचा असतो.   

हा प्रसंग अगदी खराखुरा, डोळ्यादेखत घडलेला! आणि अगदीच परवा-परवा. छत्तीसगडमध्ये दुर्गला भाच्याच्या मुंजीला गेलो होता, तिथला. घरभर राबणारा दादू तीन दिवस सतत डोळ्यापुढे होता. आपल्याही घरी अशी घरचीच होऊन गेलेली गडी-माणसे होती. आता-आता काही वर्षांपूर्वीपर्यंत. कुठे-कुठे ती अजूनही आहेत. शहरात फारच कमी. पण, छत्तीसगडमध्ये ती आहेत.  खूप पूर्वीही होती.

माझ्या आत्याच्या लग्नातला एक फोटो अजून आहे आमच्याकडे.. तीन छत्तीसगडी माणसे क्रॉस मांडी घालून पाय पोटाशी धरून बसलेली फोटोत.  आमची आजी छत्तीसगडची. लेकीच्या लेकीचे लग्न म्हणून खास तिच्या माहेरच्यांनी मदतीला तीन गडी पाठविले होते, अमरावतीला. छत्तीसगडी! फोटोतील ती तीन माणसे माझ्यासाठी एक गूढच होते. ही माणसे नोकर होती शेतावरली. वाट्टेल ते काम करावयाची. फारच अप्रूप होते मला.. का कुणास ठाऊक.. तेव्हापासून छत्तीसगडबद्दल जे काही आकर्षण माझ्या मनात निर्माण झालेय, ते आजतागायत कायम आहे.

आणि मग पाच वर्षांपूर्वी आजीच्या माहेरी गेलो. त्यांची भली विस्तीर्ण शेती आहे. त्या शेतावर गेलो तर शेत राखायला ठेवलेल्या कुटुंबातील बाया-माणसं पुढं आली. अगदी वृद्धत्वाकडे झुकलेली माणसंही आमच्या काकांच्या पाया पडली. मी नको...नको म्हणत असताना माझ्या आणि बायको-बहिणीच्या पाया पडली. आम्ही पाय मागे घेतले. काका म्हणाले,‘ करू दे नमस्कार. तू म्हणशील तर तुझ्या दीड वर्षांच्या मुलीच्याही पाया पडेल’.  क्षणभर स्वत:ची लाज वाटली.  आपल्यावर संस्कार महाराष्ट्रातील सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या वातावरणाचे. वर्ग-वर्ण आधारित ही वागणूक आपल्या ओळखीची नसलेली. किंबहुना, संकोचलेपण आणणारी.. पण, छत्तीसगड असाच आहे..पण मग, मी बघितलेला हरयाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानही तसाच आहे. कशाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही अद्याप असे प्रकार आहेत.
पण, छत्तीसगड बदलला आहे. रायपूरचे रस्ते, नागपूरने मिशीवर ताव सोडा, मिशी ठेवूच नये, इतपत सुधारलेत. छत्तीसगडच्या नव्या-जुन्या समृद्धीचे आणि विकास नामक अप्पलपोटेपणाचेही अनेक किस्से आहेत. म्हणजे, बस्तरमध्ये भांडी विसळायला गेलेला माणूस दारू व्यावसायिक कसा झाला आणि नोटबंदीच्या दिवशीच रायपूरमध्ये किती हजार किलो सोने खरेदी झाली, रायपूरमध्ये जमिनीचा भाव किती चौरस फूट आहे, वगैरे वगैरे. त्यात आत्ताच खोलवर नको जायला. सध्याचे निमित्त फक्त डोळ्यांनी अनुभवलेल्या आपल्या शेजारी राज्याचे.. लहानपणापासून कुतूहल असलेल्या छत्तीसगडच्या दर्शनाचे!
...............................................................................................

Saturday, 31 March 2018

‘स्वच्छ’ हवा शैक्षणिक भारत!


फार दिवस नाही झालेत जागतिक महिला दिन पार पडून! अवघ्या वीस दिवसांपूर्वी झालेल्या या जागतिक उत्सवानिमित्त युनेस्कोने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. मुला-मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणाचा आढावा या अहवालातून घेण्यात आला होता. या अहवालानुसार वर्षागणिक मुलींचे शाळांमध्ये जाण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असले तरी जगभरात अद्यापही ते मुलांच्या बरोबरीत आलेले नाही. मुलींच्या शाळेत न जाण्याची विविध कारणे आहेत आणि त्यांचा ठिकठिकाणी उहापोहही झाला आहे. मात्र, या अहवालानुसार इतर कारणांप्रमाणेच शाळा- कॉलजेस मध्ये स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसल्याने अनेक मुली शाळेत नियमित जात नसल्याचे दिसून आले आहे. विशेषत: मुलींच्या पाळीच्या दिवसात स्वच्छतागृहात व्यवस्था नसल्याने महिन्यातून किमान तीन दिवस मुली शाळांमध्ये हजेरीच लावत नाही, अशी माहिती या अहवालातून मांडली गेली आहे. जगातील दर दहापैकी एक विद्यार्थिनी तिच्या पाळीच्या दिवसांमध्ये शाळेत जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जगभरातील विविध देशांचे सर्वेक्षण करून हा अहवाल महिला दिनाला जाहीर करण्यात आला होता.
भारतातही शालेय संस्थांमध्ये मुलींसाठी उपलब्ध असलेली स्वच्छतागृहे, तेथील सुविधा आणि त्यांची स्थिती हा चिंतेचाच विषय आहे. विशेषत: ग्रामीण भागात तर त्यांची परिस्थिती अधिकच बिकट आहे. त्यामुळे युनेस्कोने जगभरातील सरकारकडे मुलींच्या स्वच्छतागृहांच्या प्रश्नांना प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे. शाळांमध्ये फक्त मुलींसाठीची स्वच्छतागृहे पुरविण्यात यावी असे आवाहनही याच अहवालाद्वारे करण्यात आले आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसलेले सर्वाधिक लोक भारतात राहत असल्याचे सांगितले जाते. वॉटरएड या जागतिक स्तरावर स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने जगातील स्वच्छतागृहांची अवस्था मांडणारा अहवाल २०१७ मध्ये मांडला. त्या अहवालातूनही भारतातील आणि जगातील स्वच्छतागृहांच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
विविध अभ्यासातून आणि अहवालातून मांडली जाणारी परिस्थिती आपल्या आजूबाजूलाही असल्याचे जरा डोळसपणे बघितल्यास लक्षात येते. अर्थात, शहरी आणि ग्रामीण भागातील परिस्थिती नि:संशयपणे वेगळी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतागृहांची परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी अद्यापही सुधारणांना वाव आहेच. शहरातील शाळा आणि कॉलेजेसनी मात्र स्वच्छतागृहांकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे हे निश्चित. एके काळी शाळेमधील सर्वाधिक दुर्लक्षित करण्याजोगी व्यवस्था ही स्वच्छतागृहांची राहत असे. त्यांचे बांधकाम आणि स्वच्छता हा कसा तरी पार पाडण्याचा विषय होता. मात्र, शहरी भागातील चांगल्या शाळांमध्ये आता स्वच्छतागृहांची परिस्थिती तशी राहिलेली नाही. शाळांची आणि पालकांची जागरूकता या विषयात सुधारणा घडवून आणण्यास कारणीभूत ठरली आहे. 
मुलींच्या स्वच्छतागृहांच्या संदर्भात सर्वाधिक कळीचा मुद्दा येतो तो पाळीच्या दिवसांमधील व्यवस्थेचा. पाळीच्या काळात मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध असावेत यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. कॉलेजेसमध्ये व्हेडिंग मशिन्स बसविल्या गेल्या असून नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जात आहेत. केमिस्टच्या दुकानातून वर्तमानपत्रात गुंडाळून लपत छपत नेण्याचा हा विषय आता उघडपणे बोलला जाऊ लागला आहे. ‘पॅडमॅन’ सारखा चित्रपट तयार होतो हे समाज बदलत असल्याचे निदर्शक आहे. किंबहुना, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून देखील आता वरच्या वर्गातील विद्यार्थिनींना ‘पॅडमॅन’ दाखविला जाऊ लागला आहे, हे समाजात येत चाललेल्या मोकळेपणाचेच द्योतक आहेत. 

नॅपकिन्सच्या निचऱ्याची हवी व्यवस्था 

शहरी भागातील स्वच्छतेच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स मिळायला लागले आहेत. थोडक्यात सांगायचे तर  माहोल बदल रहा है. पण, सगळेच काही चांगले होतेय असे समजण्याचे कारण नाही. अनेकदा हे नॅपकिन्स स्वच्छतागृहांमध्येच टाकून दिलेले असतात. ते नष्ट करण्याची व्यवस्था पुरविण्यात आली नसते. पॅडसचा निचरा करणारी यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे स्वच्छतागृहांमधून उपलब्ध करून दिली जाणे आवश्यक आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा आणि निचर या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिले जावे. स्वच्छतागृहे स्वच्छ असली पाहिजे याची संबंधित शैक्षणिक संस्थेने काळजी घेतली पाहिजे अशा अपेक्षा पालक आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे कॉलेजेसमधील स्वचछतागृहे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीही आहे हे मुलींनाही समजणे आवश्यक असल्याचे मत कॉलेज विद्यार्थिनी व्यक्त करताना दिसतात.
विविध संस्थांच्या तसेच भारत सरकारच्या आकडेवारीनुसार स्वच्छता या विषयात भारताने बरीच प्रगती केली आहे. भारत सरकारच्या आकडेवारीतूनही स्वच्छतागृहांची देशातील संख्या वाढली आहे. मात्र, निर्माण होत असलेली ही व्यवस्था कायम टिकून राहणे गरजेचे आहे. शालेय वयातील मुलींच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी थेट संबंध हा विषय अधिक गांभीर्याने घेणे आणि आपल्या उमलत्या कळ्यांसाठी चांगली व्यवस्था निर्माण करून देणे ही समाज आणि शासन म्हणून आपली जबाबदारी आहे.
........................................................

Wednesday, 14 March 2018

दिल मे फकीर जिंदा रख!



मनातल्या विचारांना
अंत नसतो...
तसा तो सतत जन्म घेणाऱ्या
आकांक्षांनाही नसतो...
एक झाली की दुसरी,
फुटत जातात आकांक्षा...
कधी त्याला नाव समृद्धीचे,
कधी प्रगतीचे, तर कधी
कुठल्या तरी उदात्ततेचे..!

वडाच्या पारंब्या जशा
एकातून दुसरी जन्म घेतात ..
तसा एकीतून उगम दुसरीचा...
आणि आपण बसतो
वाढत्या झाडाला खतपाणी घालत...
एकदा मोठं झालं की मोकळं होऊ
अशी अपेक्षा करीत...

पण,
मोकळं काहीच होत नाही.

पुन्हा नवे धुमारे …
बरे-वाईट,
पुन्हा नव्या आकांक्षा …
आणि
पुन्हा त्यांना कुरवाळणं…
सतत तेच ते…
संपता संपत नाही…
कशाला अंत नाही…!

आणि अंत तर
संकटांनाही नाही…
पहिल्याला धीर करून
निपटून काढावं,
तर दुसरं हजर…
कंबरेवर हात धरून
आणि विटेवर पाय ठेवून…
सतत काय तर
लढत राहायचं…
प्रश्नांना नेहमी
भिडत राहायचं…

शांती हवी आहे प्रत्येकाला आयुष्यात.…
डोक्यातील सगळे विचार
आणि
प्रत्येकाने आपल्या मनात दाबून धरलेला
किच्च काळा कार्बनवाला कचरा,
प्रत्येकाला डिस्पोझ करावयाचा आहे.…

पण होत नाहीच तसं…

"पीस" शोधायला निघालेल्या
प्रत्येकाचीच निघतात पिसं…!
एकदा नाही, रोजच निघतात…
गळून पडणाऱ्या पिसांचा
रंग तेवढा वेगळा…
बाकी सगळे मोर उघडे-बोडखेच…

यातून वर येणारी स्थितप्रज्ञता…
तशी आपल्याकडे नसतेच…
‘आता मला त्रास होत नाही’
अशी वाक्ये हतबलतेतून येतात…
न थकता.न हारता
लढण्याची ताकद येते,
पण तीही अपरिहार्यतेतून…
ते काही ठरवून झाले नसते. जाणीवेतून आलेली स्थितप्रज्ञता
आपल्याला काही जमत नाही…
इतकी मौल्यवान शांतता
आपल्याला काही मिळत नाही…

त्यामुळे त्या अर्थाने आपण
फकीरच…
फकीर बाय फोर्स,
नॉट बाय चॉइस…
सगळा शेवट फकिरीतच म्हणजे..
मग हात आणि झोळी, फिरवायलाच हवी…
पडेल ते दान घेण्यासाठी…
आणि मिळालेलं दान
स्वीकारण्यासाठी…

तो फकीर जिंदा रख भाई...
दिल मे फकीर जिंदा रख! 

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...